ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा : कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्याचा होणार भाजपात प्रवेश !

मुंबई  : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून अनेक विरोधी पक्षांतील नेत्यांसह कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेत असताना आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. पण भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. नाना पटोले यांच्या व्यक्तिमत्त्वार असा संशय निर्माण करण्यात कोणतेही तथ्य नाहीत. ते भाजपच्या संपर्कात नाहीत. ते निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

आमदार नाना पटोले हे सध्या काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या भंडारा जिल्ह्यातील एका स्थानिक कार्यकर्त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकल्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. पत्रकारांनी शुक्रवारी याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना छेडले असता नाना पटोले एक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते असल्याचे नमूद करत ते भाजपच्या संपर्कात नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, नाना पटोले यांच्या व्यक्तिमत्त्वावर अशा प्रकारचा संशय निर्माण करण्यात कोणतेही तथ्य नाहीत. ते भाजपच्या संपर्कात नाहीत. ते काँग्रेसचे एक निष्ठावान कार्यकर्ते आहेत.

नाना पटोलेंनी निवडणुकीत काँग्रेसची भूमिका अत्यंत निष्ठेने पार पडली. त्यांना अपयश आले हे दुसरी गोष्ट, पण नाना पटोले हे खऱ्या अर्थाने भाजपच्या कोणत्याही नेत्याशी, कोणत्याही पक्षप्रवेशावर किंवा पक्षात येण्यावर भूमिकाच घेऊ शकत नाहीत. कारण, त्यांची भूमिका काँग्रेसची आहे. काँग्रेसचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. पदाधिकारी आहेत. नेते आहेत. त्यामुळे नाना पटोलेंसारख्या व्यक्तीवर असा संशय व्यक्त करणे माझ्या मते योग्य नाही.

बावनकुळेंनी यावेळी विदर्भातील काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचेही स्पष्ट केले. विदर्भातील काँग्रेसचे अनेक नेते व पदाधिकारी भाजपत येण्याची इच्छा व्यक्त करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये येण्याचा विचार करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे, असे ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांचे मोबाईल सर्व्हिलान्सवर टाकण्याच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादावरही भाष्य केले. ते म्हणाले, भंडारा भाजपच्या बैठकीत आमच्या पक्षाचे महाराष्ट्रात 1 लाख बूथ आहेत. या बूथसाठी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात वॉर रूम तयार करण्यात आले आहे. या वॉररूममध्ये कोणता कार्यकर्ता कोणती योजना कशा पद्धतीने समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो. पक्षाच्या 1 लाख व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून कोण काय व्यक्त होते? समाजाच्या काय प्रतिक्रिया आहेत. यावर आम्ही रोज बसून काम करतो.

कधीकधी निवडणुकीच्या काळात निगेटिव्ह – पॉझिटिव्ह बातम्या येत असतात. त्यामुळे मी काल म्हणालो की, आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स, कार्यकर्त्यांनी केलेली कामे ही आमचे वॉररूम संपूर्णपणे चेक करते. त्यामुळे निवडणुकीच्या काळात पक्षाच्या कार्यात जे काही कामे सांगितले गेले, जे काही पक्ष म्हणून भूमिका घेतल्या. मुख्यमंत्र्यांकडून ज्या काही विकासाच्या योजना आल्या. मोदींच्या योजना आल्यात. या सर्व आम्ही मॉनिटर करून त्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!