भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका, राज्य सरकारला विचारला “हा” सवाल
मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या मुंबईत भाजप मुख्यालयात आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तुमच्या महाराष्ट्रात काय चाललयं असं, लोक मला विचारतात, या शब्दांत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. आपल्याला इम्पेरिकल डेटाची व्याख्या माहीत आहे का?, असा सवाल पंकजा यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
सत्तेत असणारे लोक अनुभवी आहेत. ओबीसींना अंधकारात लोटणारा निर्णय म्हणजे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, असे त्या म्हणाल्या. इम्पेरिकल डेटाची मागणी न्यायालयाकडून सातत्याने होत आहे. मात्र सरकारकडून दिले जात नाही. या सरकारला ओबीसी आरक्षण असुरक्षित करायचे का? आरक्षण संरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचे ढोंग सरकारने केले आहे. या अध्यादेशाविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रत्येक बलाढ्य नेत्यांच्या चुकीच्या कामांसाठी निधी आहे. पण मागासवर्गीय आयोगाला निधी उपलब्ध करुन दिलेला नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. प्रत्येक गोष्ट, निर्णय यासाठी केंद्राकडे बोट दाखवले जात असल्याचा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
पुढे भाजप नेत्या मुंडे म्हणाल्या, की महाराष्ट्र दुष्काळग्रस्त आहे. कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी याचा लोकांवर परिणाम होत आहे. यासाठी आम्ही स्वतः बांधावर गेलो. प्रधानमंत्री कृषी योजना निधी वगळता कुठलीही मदत शेतकऱ्याला भेटली नाही आहे. अशा परिस्थितीत वीज बिलाची सक्तीने वसुली केली जात आहे. याबाबत आंदोलन छेडले जाईल, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. पण शाळांनी वीज बिल भरले नसल्याकारणाने वीज कनेक्शन तोडून टाकण्यात आले आहेत. विद्यार्थी अंधारात आहेत. पण दोन मंत्र्यांत कुठलाही संवाद नाही, असा आरोपही पंकजा मुंडे यांनी लगावला आहे.
केंद्राने इंधन करात कपात केली आहे. पण महाराष्ट्र सरकारने अजून मदत केली नाही. एसटी कामगारांचा प्रश्न कठीण आहे. पण त्याबाबत चर्चा करायला सरकार तयार नाही. त्यांच्या प्रश्नाची दखल घ्यायला कोणी तयार नाही. वीजबिल वसुली बंद करा, असे सांगितल्यावर या सरकारने वीज बंद केली. वॉटर ग्रीड मराठवाडा, जलयुक्त शिवारसारख्या योजना बंद केल्या आहेत. महाराष्ट्रभर रान उठवून सरकारकडून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.