ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संविधान बदलण्याचा भाजपचा डाव; टिपू सुलतान प्रकरणी दुहेरी भूमिका — हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

बुलढाणा : वृत्तसंस्था

भाजपला देशाचे संविधान बदलायचे असून महापुरुषांविषयी सातत्याने आक्षेप घेणे हे त्यांचे ठरलेले धोरण आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. सोमवारी बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि ऐतिहासिक मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. विशेषतः भाजप आणि टिपू सुलतान यांच्याभोवती सुरू असलेल्या वादावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.

सपकाळ म्हणाले की, भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे टिपू सुलतानांविरोधात सातत्याने वक्तव्य करतात. मात्र राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या काळात काही ठिकाणी फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभांमध्ये व्यासपीठाच्या पार्श्वभूमीवर टिपू सुलतानांचे चित्र लावलेले दिसले होते, असा दावा त्यांनी केला. राजकीय सोयीप्रमाणे भूमिका बदलण्याचे हे उदाहरण असल्याची टीका त्यांनी केली. उद्या टिपू सुलतानांचे वंशज भाजपमध्ये प्रवेश करतील, तर त्यांनाही मोठी पदे दिली जातील, असा टोला त्यांनी लगावला.

‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकाचा उल्लेख करत सपकाळ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लिखाणावर प्रश्न उपस्थित केला. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचे आणि आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाजी महाराजांच्या सज्जनपणाला विकृती म्हणण्याचे धाडस या पुस्तकात करण्यात आले असून, स्वराज्य स्थापन होणारच होते; पण कावळा बसायला आणि डांग तुटायला जसे होते, तसे शिवाजी महाराज आले, असा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. अशा विचारांना भाजप मान्यता देते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शिवाजी महाराजांविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना सपकाळ म्हणाले की, शिवाजी महाराज अद्वितीय असून त्यांचे कार्य आणि कर्तृत्व अनुपम आहे. ते रयतेचे राजे होते आणि त्यांच्या विषयी कोणतेही चुकीचे विधान आपण केलेले नाही. दोन वेगवेगळ्या कालखंडातील महापुरुषांविषयी विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भात आपण मत व्यक्त केले होते. राज्यात सध्या जाती-धर्मात तेढ निर्माण होत असल्याने सर्व महापुरुषांचे छायाचित्र समकक्ष पातळीवर लावावेत का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या अनुषंगाने आपण बोललो, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडली आणि ते बहुजनांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊनच टिपू सुलतानांनी लढा दिला, असे ऐतिहासिक संदर्भ सांगितले जातात. त्यामुळे दोघांचे छायाचित्र एकत्र लावण्यात गैर नाही, असे आपण मत व्यक्त केले होते. मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यास करून चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यात जाणूनबुजून गोंधळ निर्माण करण्याचे राजकारण सुरू असून त्यातून सामाजिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!