नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सीमावादाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लडाखमधील चीनच्या कथित घुसखोरीचा आणि भारतीय सैनिकांच्या बलिदानाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. परिणामी, लोकसभेचे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत स्थगित करावे लागले.
मंगळवारी सभागृहाची कार्यवाही सुरू होताच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी चीनचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “लडाखमध्ये चीनचा हस्तक्षेप सातत्याने वाढत आहे. आपल्या जवानांचे बलिदान होत आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. आज जागतिक राजकारणात अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष केंद्रस्थानी असून त्याचा थेट परिणाम भारतावर होत आहे. मात्र पंतप्रधान या विषयावर मौन बाळगून आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी यावेळी माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या अप्रकाशित संस्मरणांचा तसेच एका मासिकातील लेखाचा संदर्भ दिला. “मी या लेखाची सत्यता पडताळून पाहिली असून, यावर बोलण्याचा मला पूर्ण अधिकार आहे,” असा दावाही त्यांनी केला.
मात्र, राहुल गांधींच्या या भाषणावर केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र आक्षेप घेतला. रिजिजू म्हणाले, “विरोधी पक्षनेते वारंवार संसदीय नियमांचे उल्लंघन करत आहेत. ज्या विषयावर सभापती ओम बिर्ला यांनी कालच स्पष्ट निर्णय दिला आहे, तोच विषय पुन्हा उपस्थित करणे योग्य नाही. अप्रकाशित पुस्तके किंवा लेखांचा संदर्भ देण्यास सभागृहाच्या नियमांनुसार परवानगी नाही.”
ते पुढे म्हणाले, “सरकार विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे ऐकण्यास तयार आहे, मात्र त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणापुरतेच स्वतःला मर्यादित ठेवावे. आधीच निकाली निघालेल्या विषयांवर पुन्हा चर्चा करून सभागृहाची दिशाभूल करू नये.”
सभागृहाचे कामकाज पाहत असलेले चेअरपर्सन कृष्णा प्रसाद टेनेटी यांनी राहुल गांधींना चीनच्या मुद्द्याऐवजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्याचे निर्देश दिले. यावर राहुल गांधी संतप्त झाले. “मी लोकसभेतील विरोधी पक्षनेता आहे. मला माझे मत मांडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मला बोलण्याची संधी का दिली जात नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या वादात काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनीही सहभाग घेत सरकारवर विरोधकांचा आवाज दाबण्याचा आरोप केला. सरकार जाणीवपूर्वक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा टाळत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राहुल गांधींनी चीनच्या मुद्द्यावर बोलण्याचा आग्रह धरताच सत्ताधारी भाजप खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजूंनी झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. चेअरपर्सननी वारंवार शांततेचे आवाहन केले, मात्र गोंधळ न थांबल्याने अखेर लोकसभेची कार्यवाही दुपारी ३ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली.
उल्लेखनीय बाब म्हणजे, सोमवारीही राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले होते. त्यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी अप्रकाशित किंवा अधिकृत मान्यता नसलेल्या लिखाणाचा संदर्भ देण्यास स्पष्ट मनाई केली होती. मात्र, मंगळवारी पुन्हा तोच मुद्दा उपस्थित झाल्याने संसदेत संघर्ष अधिक तीव्र झाला. एकूणच, सीमावाद आणि चीनच्या मुद्द्यावर सरकारकडून थेट उत्तर मिळावे, या भूमिकेवर विरोधक ठाम असून, संसदीय नियमांचा आधार घेत सरकार हा हल्ला परतवून लावत असल्याचे चित्र लोकसभेत दिसून आले.