जयहिंद शुगर दोन हप्त्यात रु.२१०० प्रति टन प्रमाणे ऊस बिल देणार : चेअरमन गणेश माने देशमुख यांनी मांडली भूमिका
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१३ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जयहिंद शुगर कारखान्याच्या सहाव्या गळीत हंगामाची सांगता नुकतीच करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख हे उपस्थित होते.चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांनी जो विश्वास जयहिंद कारखान्यावर दाखविला आहे तो तसाच वृद्धिंगत ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे याप्रसंगी बोलताना चेअरमन गणेश माने देशमुख यांनी
सांगितले.
आपल्या कारखान्याची शासकीय संस्थाकडून विविध प्रकारची येणे रक्कम जवळपास ३८ कोटी इतकी आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक अडचण, शेतीची कामे तसेच कौटुंबिक व इतर तातडीची कामे लक्षात घेता चालू २०२०-२१ गळीत हंगामातील प्रति टन २१०० रुपये प्रमाणे ऊस बिलापैकी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी पहिला ॲडव्हान्स हप्ता त्यांचे बँक खाते वरती लवकरच जमा करीत आहोत. निधी उपलब्धतेनुसार दुसरा हप्ता इतर खर्च व देणी थांबवून प्राधान्याने शेतकऱ्यांना देण्यात येईल,असेही ते म्हणाले.तसेच चालू हंगामात उशिरा गाळपास आलेल्या ऊसास १ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी मधील ऊसास प्रति टन रु.२२०० प्रमाणे व १८ फेब्रुवारीचे पुढील ऊसास प्रति टन रु.२३०० प्रमाणे ऊस बिल जमा करण्यात येईल,असेही माने देशमुख यांनी सांगितले.