मुंबई : वृत्तसंस्था
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असून राज्याने सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर अनेक विभागांमधील उच्च अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तयारीसाठी मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस प्रमुख, गृह विभागाचे उच्च अधिकारी आणि विविध संस्था आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
सध्याच्या तणावाच्या परिस्थितीवर प्रत्येक जिल्ह्यात एक वॉर रूम स्थापन करण्यात यावी, मॉक ड्रिल घ्यावेत असे निर्देश असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ब्लॅकआउट दरम्यान रुग्णालयांमध्ये समन्वय यंत्रणा उभारावी. त्याचप्रमाणे, अशा वेळी बॅकअप पॉवर स्टँडबाय ठेवावी. बाहेरून प्रकाश दिसू नये यासाठी गडद पडदे आणि खिडक्यांचे काचेचा वापर करावा, असेही निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
खोट्या बातम्या पसरवणाऱ्या आणि शत्रूला मदत करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच पाकिस्तानला कोण मदत करत आहे हे शोधण्यासाठी सायबर गुन्हे विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील सोशल मीडिया हँडलवर लक्ष ठेवले अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.
तसेच पोलिसांना कोम्बिंग ऑपरेशन आणि बंदोबस्त वाढवण्याचे निर्देश देण्यात आले असून सैन्याच्या तयारीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या आणि सोशल मीडियावर दृश्ये शेअर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे देखील फडणवीस म्हणाले.