मुंबई : वृत्तसंस्था
कोकणातील चिपळूण येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या विभागीय प्रशिक्षण शिबिराच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सपकाळ म्हणाले, “भारतात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. काँग्रेसची विचारधारा संविधानाभिमुख आहे, तर भाजपची विचारधारा मनुस्मृतीसारखी अस्पृश्यता मानणारी आहे.”
सपकाळ यांनी आरोप केला की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघला सत्ता आणि संपत्ती हवी असून, त्यांनी देशातील सर्व यंत्रणांवर कब्जा केला आहे. “हिंसा, द्वेष, अपप्रचार आणि देशाचा फायदा मूठभर लोकांना मिळावा ही त्यांची संकल्पना आहे. निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, न्यायपालिका, सरकारी यंत्रणा – सगळ्यांवर त्यांनी कब्जा केला आहे. देशभर त्यांनी थैमान घातले आहे,” असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या भूमिकेबद्दल बोलताना सपकाळ म्हणाले, “हा देश सर्वांचा आहे. संपत्तीवर सर्वांचा समान अधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, संविधानानुसार चालणारा भारत – हे काँग्रेसचे ध्येय आहे. या संविधानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचे विचार, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह सर्व महापुरुषांचे विचार अंतर्भूत आहेत. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात सर्व विचारधारांचा समावेश करून देश चालवण्याचा प्रयत्न केला गेला होता.”
सपकाळ यांनी ऐतिहासिक उदाहरण सांगत, “एका गरीब महिलेने नेहरूंची कॉलर पकडून ‘स्वातंत्र्याने मला काय दिले?’ असा प्रश्न केला होता. नेहरूंनी तिला अटक न करता शांतपणे उत्तर दिले. आज परिस्थिती वेगळी आहे; युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले तर त्यांना तुरुंगात टाकले जाते आणि देशद्रोही ठरवले जाते.”
शिवाय, त्यांनी म्हटले की, “काँग्रेसवर अनेकदा दबाव आणला गेला, पण ती संपणार नाही. काँग्रेसाला मोठा वारसा लाभला आहे. राहुल गांधी यांनी सर्वांना धैर्य दाखवण्याचा संदेश दिला आहे. कोणत्याही दबावाला, दहशतीला न घाबरता विचारधारेची लढाई लढणाऱ्यांचेच हे युद्ध जिंकण्यास तयार आहेत.”