अक्कलकोट : कोरोना संपलेला नाही. काही प्रमाणात फक्त निर्बंध शिथिल झाले आहेत म्हणून बेफिकीर राहू नका, जबाबदारीने वागा, असे आवाहन मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी केले आहे. कोरोना हा आजार संसर्गजन्य आहे. हे माहीत असूनही एकदम खुलेआमपणे गर्दी करणे हे चुकीचेच आहे असा प्रकार शहरात होऊ देऊ नका. प्रत्येकाने याबाबतीत जबाबदारीने पाऊल टाकले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ७ जुन पासून जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध कायम ठेवले आहेत पण काही गोष्टी साठी शिथिलता देखील आणली आहे. त्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. सध्या सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू आहेत. शनिवारी आणि रविवारी मात्र दोन दिवस किराणा आणि अत्यावश्यक सेवा सुरू आहेत.
बाकीचे दुकान बंद आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून अक्कलकोट शहरात कोरोनाचे रुग्ण हे बोटावर मोजण्याइतपत आढळत आहेत. ही बाब शहरवासीयांसाठी सकारात्मक आहे याचा अर्थ लोकांनी गर्दी करावी आणि कोरोनाला निमंत्रण द्यावे असा होत नाही तर ही स्थिती कायम ठेवण्यात प्रत्येक नागरिकांचा वाटा महत्त्वाचा आहे. प्रशासन वारंवार गर्दी करू नये, सोशल डिस्टन्स ठेवा, मास्कचा वापर करा अशा प्रकारचे आवाहन करत आहे. ही जबाबदारी शहरातील प्रत्येक नागरिकाची आहे. त्याशिवाय जे व्यापारी शहरात आपला व्यापार करत आहेत किंवा त्यांचा व्यवसाय आहे त्यांनी देखील ग्राहकांना या नियमांची जाणीव करून देऊन त्यांच्याकडून नियमांची पायमल्ली होऊ नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्ट प्रशासन करू शकत नाही मात्र ही गोष्ट ज्यावेळी सर्वांच्या मनातून सर्वांच्या सुरू होईल. त्यावेळी मात्र कोरोना शहरातून पूर्णपणे हद्दपार होईल, यात शंका नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
अक्कलकोट शहराला धार्मिक अधिष्ठान आहे त्यामुळे लोक बाहेरून मोठ्या प्रमाणात येतात त्याची काळजी शहरातील नागरिकांनी सुद्धा घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने जर खबरदारी घेऊन वाटचाल केली तर कोरोना मुक्त शहर होण्याबरोबरच प्रशासनावरचा ताण देखील कमी होण्यास मदत होईल. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.