कुणी कुणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे, हे त्यांनी ठरवावं,देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया !
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. सरनाईक यांच्या या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण त्यांनी पत्रात भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या पत्रावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच अनेकांची इच्छा असू शकते. पण हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेचे प्रश्न आम्ही मांडत आहोत. आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो. पण आमच्याकडे बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कुणी कुणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे, हे त्यांनी ठरवावं. कुणासोबत कुणी जायचं आता त्यांनी ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेच्या बांधीलकीतून आम्ही काम करत राहू, असंही फडणवीस म्हणाले.