अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. पुन्हा गर्दीच्या काळात म्हणजे येत्या गुरुवारी अधिकारी परत पाहणी करतील आणि नियोजनाच्या बाबतीत अंतिम निर्णय घेतील, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रांताधिकारी सुमित शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, तहसीलदार विनायक मगर, मुख्याधिकारी डाके,पोलीस निरीक्षक टाकणे यांनी भेटी दरम्यान गर्दीच्या व्यवस्थापनासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याबाबत प्राथमिक
चर्चा केल्याचे समजते. लवकरच पुण्यतिथी उत्सव आहे.
या काळात भाविकांना दर्शनाची सुविधा आणखी आणखी चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांच्या कार्यालयात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सवाच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली होती.त्यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनानुसार
आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार एक समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला होता.याबाबतीत समिती निर्णय घेईल.मंदिर समिती व प्रशासन यांचा समावेश असलेली समिती
गर्दीचे व्यवस्थापन करणार आहे.मंदिर प्रशासनासोबतच भाविकांना सोयी सुविधा नगरपालिका, पोलीस व महसुल प्रशासन करत असते. आणखी काही सोयी सुविधा मंदिर समितीने करणे अपेक्षित आहे. मंदिरातील सध्याची व्यवस्था ही भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी नाही. एखादी आपत्ती निर्माण झाली तर खुप मोठी दुर्घटना होऊ शकते. गाभाऱ्यात एकदम पन्नास पन्नास लोक सोडले जातात. यासाठी ही पाहणी करण्यात आल्याचे डाके यांनी संचारशी बोलताना सांगितले. दरम्यान पाहणी करत असताना देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्याकडून मंदिर समितीच्या मर्यादा आणि काही अडचणी प्रशासनाने समजून घेतल्या. त्याबाबत ही प्रशासनात
चर्चा झाली.या पाहणी व बैठकीस प्रांताधिकारी शिंदे,तहसिलदार मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार, मुख्याधिकारी रमाकांत डाके, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, प्रथमेश इंगळे आदीसह अधिकारी उपस्थित होते.