छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात महायुती व महाविकास आघाडीत नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीवर त्यांनी आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले आहेत.
वास्तविक या जमिनीची बाजार किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचं कागदोपत्री दाखवलं गेलं, परंतु प्रत्यक्ष किंमत 1800 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरुन अंबादास दानवे यांनी पार्थ पवारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. कोणत्याही अनुभवाशिवाय या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? 27 दिवसात हा सर्व व्यवहार कसा झाला? 40 एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी फक्त रुपये 500 रुपये कशी? असे अनेक प्रश्न दानवे यांनी उपस्थित केले आहे.
अंबादास दानवे यांनी केलेली पोस्ट देखील पहा….
१८०० कोटींची जमीन
३०० कोटींत खरेदी,
स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये!
उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं.
गंमत तर पुढे आहे..एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल!
दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! २२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५००!
फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!