मुंबई : वृत्तसंस्था
महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला एकही जागा नाही, मग त्याऐवजी केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद, राज्यात मंत्रिपद, विधानसभा निवडणुकीत जागा, महामंडळांमध्ये वाटा मिळावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपकडे केली आहे. शुक्रवारी त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली.
फडणवीसांच्या भेटीनंतर आठवलेंनी महायुतीकडील मागण्यांची यादीच पत्रकारांना वाचून दाखवली आहे. आम्ही एनडीएसोबतच आहोत, आम्ही ईशान्य मुंबईची जागा जिंकू शकलो असतो, असे आठवले पत्रकारांशी बोलताना म्हणाले. दोन मित्रपक्ष आल्याने आमची अडचण झाली आहे. आम्हाला जागांवर पाणी सोडावे लागले तरी आम्ही पाणी अडवणारे लोक आहोत. पाणी वाहून जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असेही ते म्हणाले. मी भाजपसोबत असल्याने दलित, बौद्ध मते भाजप आणि महायुतीलाच मिळतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.