ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजित पवार विमान दुर्घटनेवर संशय कायम; सत्य शोधण्यासाठी रोहित पवारांची दिल्ली दौड

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला वीस दिवस पूर्ण झाले तरी अपघातामागील कारणांबाबतचे गूढ कायम आहे. या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय व्यक्त करत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सरकारकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी ठोस प्रगती दिसून येत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान, अपघातामागील सत्य शोधण्यासाठी रोहित पवार सध्या दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. विमान अपघातासंदर्भातील तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी ते वैमानिक, निवृत्त अधिकारी आणि हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांच्या भेटी घेत आहेत. उड्डाणापूर्वीची तपासणी, हवामानस्थिती, यंत्रणांची कार्यक्षमता, वैमानिकांचा अनुभव तसेच नियमांचे पालन झाले होते का, या सर्व बाबींचा ते अभ्यास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अधिकृत चौकशी अहवाल जाहीर होण्यास विलंब होत असल्याने रोहित पवार यांनी स्वतंत्र पातळीवर माहिती संकलन सुरू केले आहे. अपघातातील प्रत्येक पैलूची छाननी व्हावी आणि कोणतीही बाब दडपली जाऊ नये, यासाठी त्यांनी खासगी गुप्तहेरांची मदत घेतल्याची चर्चा आहे. अधिकृत अहवालास वेळ लागू शकतो, असे संबंधित अधिकाऱ्यांचे मत असले तरी सत्य लवकर समोर यावे, अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान, या प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय कडून अद्याप प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे. तसेच संबंधित विमान कंपनी ‘व्हीएसआर’विरोधात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन झाले का, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी समाज माध्यमांद्वारे केली आहे.

ही दुर्घटना २८ जानेवारी रोजी घडली. अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी त्यांचे भाडेतत्त्वावरील विमान मुंबईहून उड्डाण झाले. सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास बारामती परिसरात पोहोचल्यावर धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच विमान बाजूच्या शेतात कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाचा स्फोट झाला आणि या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर राज्यभरात शोककळा पसरली असताना आता या अपघातामागील कारणांचा उलगडा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिकृत अहवाल आणि स्वतंत्र चौकशी यांमुळे सत्य समोर येईल का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!