मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकऱ्याला कोणत्याना कोणत्या कारणाने नेहमीच टेन्शन येत असते, सोयाबीनचे उत्पादन घेतल्यानंतर त्याला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्याला होती. यामुळे काढणी केल्यानंतर सोयाबीन विक्री न करता त्याची साठवणूक केली. मात्र प्रतीक्षा करून देखील सोयाबीनच्या दरात वाढ होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. यंदा जिल्ह्यातील कळंब, भुम, धाराशिव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पिक घेतले. लागवड खर्चाच्या तुलनेत सोयाबीनला किमान ५५०० ते ६ हजार इतका भाव मिळणे अपेक्षित होते. मात्र यंदा सोयाबीनला केवळ ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत त्यांनी सोयाबीन विक्री सुरू केली आहे. तर बहुतांश शेतकरी भाव वाढतील या आशेवर आहेत. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील सोयाबीनला अपेक्षित दर मिळणे अवघड झाले आहे. प्रतिक्षा करुन देखील भाव वाढत नसल्याने सोयाबीन घरी ठेवावे की विकुन मोकळे व्हावे; अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. मात्र त्यामुळे सोयाबीन भावाबाबत सरकारने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यातुन केली जात आहे.