मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यापासून चिंतेत असून आता कांद्याची निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना वाढत चालली असून कांदा निर्यातीवर अचानक बंदी, अशातच आधीच दुष्काळ आणि त्यानंतरच्या अवकाळी पावसाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लसणाच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे.
लसूण हा स्वयंपाक घरातील महत्त्वाचा पदार्थ आहे. लसणाशिवाय (Garlic) भाज्यांना चव येत नाही. यावर्षी खराब हवामानाचा फटका सर्वच पिकांना बसला आहे. यात लसणाचाही समावेश आहे. हवामानाचा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात लसणाचे उत्पादन घेतले जाते. येथे अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
त्यामुळे उशिरा लसणाची काढणी झाल्याने दर वाढले आहेत. दराचा विचार केला तर मागील काही आठवड्यात देशातील किरकोळ बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो 300 ते 400 रुपयांवर गेले आहेत. घाऊक बाजारात लसणाची किंमत 150 ते 250 रुपये इतकी झाली आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, जानेवारी अखेरपर्यंत किरकोळ बाजारात लसणाची किंमत प्रतिकिलो 250 ते 350 रुपयांच्या दरम्यान राहील. दर पुन्हा जैसे थे होण्यासाठी मार्च महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. ग्राहकांना सध्या जास्त पैसे देऊन लसूण खरेदी करावा लागत आहे. भारतात 32.7 लाख टन लसणाचे उत्पादन होते. तर चीनमध्ये दरवर्षी सुमारे 2 ते 25 दशलक्ष टन लसणाचे उत्पादन होते. दोन्ही देशांमध्ये बहुतेक लसणाचा वापर देशांतर्गत केला जातो.