नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल उपस्थित केला. ऑपरेशन सिंदूर वरून केंद्र सरकारवर अरविंद सावंत यांनी हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. याच सोबत भारतीय सैन्याचे कौतुक देखील केले.
अरविंद सावंत म्हणाले, जेव्हा ऑपरेशन सिंदूर बद्दल बोलले जात, तेव्हा पहिल्यांदा तर हे का झाले असा प्रश्न आहे. पहलगाम हल्ला झाला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर केले. मी काही काळासाठी मंत्री होतो आणि जेव्हा काश्मीरमध्ये गेलो होतो इलेक्ट्रिक बसेसचे उद्घाटन करायला. तेव्हा ठिकठिकाणी पोलिस तैनात होते, तसेच सशस्त्र जवान उपस्थित होते. मग पहलगामचा हल्ला झाला तेव्हा तिथे कोणीच कसे नाही? पोलिस नाही, जवान नाही? पर्यटक आले होते त्यांच्या सुरक्षेसाठी कोणीच कसे नाही? सैन्याला आदेश कोणी दिले होते तिथून जाण्यासाठी? इथून तपास झाला पाहिजे.
मंत्री असताना मी सुद्धा पहलगामला गेलो होतो. एवढे मोठे मैदान आहे तिथे. मी गेलो तेव्हा तिथे पोलिस होते जवान होते. मग त्या दिवशी सगळे जवान कुठे गेले होते? हे आतंकवादी कुठून आले होते? या पूर्वी देखील अनेक आतंकवादी हल्ले झाले आहेत. मुंबईच्या साखळी ब्लास्टमधल्या अनेकांना निर्दोष मुक्त केले. याचा अर्थ असा की आपण आतंकवादी म्हणून निर्दोष लोकांना पकडले होते. आपण आतंकवाद्यांना पकडू शकलो नाही.
काश्मीरचे सत्यपाल मलिक जेव्हा राज्यपाल होते, तेव्हा त्यांनी सरकारला वेळोवेळी सांगितले की काहीतरी गडबड आहे. या सीआरपीएफ जवानांना विमान देण्यात यावे. पण या सरकारने दिले नाही. त्यांनी पंतप्रधानांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, आपले प्रधानमंत्री कॉर्बीट पार्कमध्ये होते. एवढा मोठा हल्ला झाला, ते तिथे नाही गेले. ते आधी दिल्लीला गेले, तिथून दुसऱ्या एका कार्यक्रमाला गेले. पुलवामाच्या हल्ल्यापूर्वी सत्यपाल मलिक सारखं सारखं म्हणत होते गडबड होणार आहे आणि तुम्ही जवानांना विमान न देता रस्त्याच्या मार्गाने पाठवले. 40 जवान शहीद झाले. आजपर्यंत पकडले गेले नाहीत आतंकवादी.
ऑपरेशन सिंदूर नाव देऊन भावनांशी खेळत आहात. सिंदूर कोणाचे पुसले गेले आपल्या बहीणींचे. त्या आतंकवाद्यांना आजपर्यंत पकडू शकले नाहीत आणि सिंदूर नाव देता. आपण दहशतवाद्यांवर हल्ले केले मी मान्य करतो. पण हे आतंकवादी पकडले गेले नाहीत. तुम्हाला काही वाटत नाही? असे म्हणत अरविंद सावंत यांनी थेट मोदींनाच सवाल केला. बिहारमध्ये जाऊन इंग्रजीत भाषण करता, पहलगाममध्ये अजून गेले नाहीत. आजपर्यंत मणिपूरला सुद्धा गेले नाहीत. तुम्हाला वेदना नाही होत का? दुःख नाही होत? त्रास नाही होत? लाज नाही वाटत? आणि इथे ढोल वाजवत बसतात. तुम्ही जर मोकळीक दिली होती तर बिनशर्त युद्धबंदी कसे काय केले? बिनशर्त का युद्धबंदी केली?
आपली सगळ्यात मोठी वाईट गोष्ट ही आहे की एक राष्ट्र सुद्धा आपल्यासोबत बोलत नाही. आपण तर विश्वगुरु म्हणवतो स्वतःला. विविध देशांमध्ये जाऊन युद्धावर बोलून आलो. पण एक देश सुद्धा आपल्यासोबत नाही उभे राहिले. ते इस्राइल तरु उभे राहिले का आपल्या बाजूने? त्याच्यासाठी आपण इराकला विरोध केला. तो इराक जो आपल्याला तेल देतो, पैसे नंतर द्या म्हणतो पण तेल घ्या म्हणतो. त्या इराकसोबतचे संबंध सुद्धा बिघडले. हे आहे आपले परराष्ट्र धोरण!