मुंबई :मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग तूर्तास अटकेपासून दिलासा मिळाला आहे. सिंग यांच्यावर सोमवार, २४ मे पर्यंत अटकेची कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास राज्य सरकारला दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी अपूर्ण राहिल्यानं परमबीर यांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे.
ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी परमबीर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी शुक्रवारी (21 मे) अपूर्ण राहिल्याने हायकोर्टाने हे निर्देश दिले आहेत.
परमबीर सिंग यांच्याविरोधात भीमराव घाडगे यांनी साल २०१५मध्ये ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तक्रार दिली होती. मग पाच वर्षांनी यात गुन्हा दाखल करण्याचं कारण काय?, तसेच डीजीपी संजय पांडे यांनी या तपासातून माघार घेण्याचं कारण काय?, आणि अजूनही ते राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर कायम आहेत. याचा अर्थ ते राज्य सरकारच्यावतीनेच परमबीर यांच्याशी वाटाघाटी करत होते हे स्पष्टच आहे. असा आरोप परमबीर यांचे वकील महेश जेठमलानी यांनी केला आहे.