ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दोघे भाऊ एकत्र आले, तर… ठाकरेंच्या नेत्याचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था

बिहार राज्यातील निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु असताना आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर मोठे विधान केले आहे. दोघे भाऊ एकत्र आले, तर मुंबई महापालिका आपल्या ताब्यात येईल, असे खैरे म्हणालेत. यासोबतच त्यांनी काँग्रेसला फटकारत, आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्रिभाषा सूत्राचा अध्यादेश रद्द झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रथमच एकाच व्यासपीठावर आले. या घटनेमुळेच आता ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील अनेकवेळा दोन्ही बंधु एकत्र येणार असल्याचे सुतोवाच केले. मात्र, याबाबत अद्याप दोन्ही पक्षांकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अशात या युतीच्या चर्चेवर आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे बंधुंच्या युतीबाबत अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. “दोन्ही ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) एकत्र आले, तर त्यामुळे मोठा फरक पडेल आणि त्यामुळे मुंबई महापालिकेवर विजय मिळू शकेल, हे कोणीही नाकारू शकत नाही,” असे खैरे म्हणाले. त्यांनी मुंबईच्या राजकारणाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना, “ही मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्यांच्यामुळेच मुंबई वाचलेली आहे, नाही तर या लोकांनी मुंबई कधीच तोडली असती,” असेही नमूद केले.

तेव्हाचे काँग्रेसचे सरकार असेल किंवा आताचे केंद्र सरकार असेल मुबई कशी काबीज करायची? असा त्यांचा प्रयत्न असतो. पण मराठी माणूस हा मराठी नेतृत्वाकडे पहात आहे, त्यामुळे दाव्याने सांगतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका ताब्यात येऊ शकते, असा आत्मविश्वास खैरे यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केवळ ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचे आवाहन केले नाही, तर सध्याच्या राजकीय परिस्थितीत तडजोड करण्याची गरजही व्यक्त केली. सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळे लढायला लागले आहेत, पण कुठेतरी ऍडजस्टमेंट करावी लागेल, कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. सध्या डाऊन फॉल सुरू असला तरी आपल्याला निवडून येण्यासाठी तडजोड करावी लागेल, नाही तर भाजपा पुन्हा डोक्यावर बसेल, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!