मुंबई : वृत्तसंस्था
त्रिभाषा धोरणानंतर महाराष्ट्रातील वातावरण पेटलं असून सरकारला शेवटी हे धोरण मागे घ्यावं लागलं. त्यानंतर मुंबईत मराठी-हिंदी वाद पाहायला मिळाला. तसेच, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आव्हान केले होते. तुम्ही उत्तर भारतात येऊन दाखवा, तुम्हाला पटक-पटक के मारेंगे असे दुबे म्हणाले होते. यावर आज मीरा रोडमध्ये बोलतांना राज ठाकरे यांना खासदार निशिकांत दुबे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
ठाकरे म्हणाले की- काही दिवसांपूर्वी बिहारचा खासदार दुबे हा आम्हाला म्हणतो की, तुम्ही आमच्याकडे येऊन दाखवा, तुम्हाला पटक पटक के मारेंगे. या खासदारावर केस झाली का? याचा विचार तुम्ही आम्ही करायला हवा. कारण या नेत्यांना बोलतांना माहिती असते की, सरकार आपल्या पाठिशी आहे. त्यामुळे ही अशा प्रकारची भाषा करत असतात. पण दुबे मी तुम्हाला सांगतोय की, तुम्ही मुंबईत येऊन दाखवा. तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबो डुबो के मारेंगे.
राज ठाकरे व्यासपीठावर आल्यावर एकच जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी तिथे घोडा आणलेला होता, ते पाहून राज ठाकरे म्हणाले, मी काय बोलतो हे माणसांना कळत नाही घोड्याला काय कळणार? यावेळी एकच हशा पिकला.
मीरा भाईंदरला मी मुद्दाम आलो आहे. त्या दिवशी जो प्रसंग घडला होता, मिठाईवाल्याचा काही तरी झाला होता. कानावर मराठी बसत नसेल तर कानाखाली बसणारच. इथल्या व्यापाऱ्यांनी संप पुकारला, त्यांच्या कानाखाली मारली होती का? कुठल्या तरी पक्षाचे ऐकून हे संप वगैरे काढणार, तुम्हाला काय वाटले मराठी व्यापारी नाही? महाराष्ट्रात राहत आहात शांततेत राहा, मराठी शिका. इथे मस्ती करणार असाल तर फटका बसणार म्हणजे बसणार.
कॉंग्रेसच्या काळापासून हे सुरू आहे. इतका प्रचंड मोठा लढा संयुक्त महाराष्ट्राचा झाला. मुंबईला महाराष्ट्रापासून बाजूला करायचा डाव होता, हा डाव गुजराती व्यापऱ्यांचा आणि गुजराती नेत्यांचा होता. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये हे कोणी म्हटले होते वल्लभभाई पटेल यांनी सांगितले होते. त्यांना लोह पुरुष मानतो, आपण त्यांना आदर्श मनात होतो, त्यांनी महाराष्ट्राला विरोध केला. मोरारजी देसाई गोळीबार करून मराठी माणसाला ठार मारले होते. यांचा अनेक वर्षांपासून मुंबईवर डोळा आहे.
बिहारमधील लोकाना माझं एक विचारणं आहे- २८ सप्टेंबर २०११ हिंमतनगरजवळ १४ महिन्याचा मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर बिहारी लोकांना मारहाण केली . जवळपास २० हजार लोकांना गुजरातमधून हाकलून लावले. तेव्हा तुम्हाला या घटनेच्या बातम्या दिसल्या का?, असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. शिवतीर्थावर मी मोदींना सांगितले होते मराठी भाषेला तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा द्या. दर्जा मिळाला पण एक रुपया निधी मिळाला नाही. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर कमीत कमी 1400 वर्षांचा इतिहास हवा, हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजून 1200 वर्ष आहे. आणि ही भाषा तुम्ही आमच्यावर लादणार?
कमीत कमी १४०० वर्ष जुनी भाषा असायला हवी. हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या भाषेचा इतिहास १२०० वर्षांचा आहे आणि ती भाषा तुम्ही आमच्यावर लादणार का? हिंदीमुळे केवळ बॉलिवूडच्या नट आणि नट्यांचं भलं झालं. हिंदीमुळे तुम्ही का पुढे गेला नाहीत. मग तुम्ही आमच्या मुंबईत कामासाठी का येता? हिंदीने तुमचं काय भलं केलं? कोणती भाषा घेऊन बसले आपण? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
ठाकरे पुढे म्हणाले, अन् या हिंदीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पेटलेत. याचे काही मला समजू शकले नाही. हिंदी कुणाचीही राजभाषा होऊ शकत नाही. हिंदी ही इकडच्या तिकडच्या भाषा मिळून 200 वर्षापूर्वी तयार झालेली भाषा आहे. हिंदीने जवळपास १५०० भाषा मारल्या. आणि आपल्या मराठीला २००० वर्षांचा इतिहास आहे. तर मग तुम्ही कोणत्या दिशेने चालला आहात?
ते पुढे म्हणाले- हनुमान चालिसा ही अवधी भाषेत आहे, ती हिंदी नाही. हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. प्रथम तुम्ही भाषा समजून घेतली पाहिजे. माझे तर सर्वच भाषेवर प्रेम आहे. मला तुम्हाला सांगायचे आहे की तुम्ही सतर्क राहिले पाहिजे. तुम्ही खडकासारखे टणक असले पाहिजे. महाराष्ट्राची भक्कमपणे बाजू उभी केली पाहिजे.
सव्वाशे वर्ष या महाराष्ट्राने देशावर राज्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणायचे, हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हिंदी राज्य नव्हे. या प्रांतावर आमचा अधिकार आहे. पाकिस्तानच्या अटक किल्ल्यावर भगवा फडकवला होता आम्ही. आणि हा महाराष्ट्र हतबल आहे? हा महाराष्ट्र हात पसरतोय? आम्ही भिका मागायच्या का? तुम्ही या महाराष्ट्राचे मालक आहात? ते नाही.