ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘या’ अटीवर जरांगे पाटलांना मिळाली बैठकीला परवानगी

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे वेळोवेळी आंदोलन करीत असतांना यावर आज परळीत बैठक होणार आहे. या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी द्यावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेत. तसेच यावेळी जरांगेंनी चिथावणीखोर भाषण करू नये. उमेदवारांना गावबंदीचे आवाहन करू नये असे सक्तीचे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यांनी आंदोलनक मनोज जरांगे पाटील चांगलेच चर्चेत आहेत. सभांमध्ये होणाऱ्या भाषणांतून जरांगे पाटलांनी केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर बऱ्याच ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
आरक्षणाचा मुद्दा निकाली लागत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांना गावात प्रवेश देऊ नका, असे आवाहन जरांगेंनी अनेकदा मराठा बांधवांना केले आहे. मात्र आता तसे आवाहन न करण्याचे सक्तीचे आदेश कोर्टाने जरांगेंना दिलेत. आज संध्याकाळी 6 वाजता मराठा समाजाने परळीत बैठकीचे आयोजन केले आहे. मनोज जरांगे हे स्वतः बैठकीला येणार होते. मात्र जिल्हाधिकारी यांनी आचारसंहितेचं कारण देऊन जातीय सभा संमेलनावर, बैठकांवर बंदी घातली होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी देखील बैठकीला परवानगी नाकारली होती. तसेच नगरपालिकेने जरांगे पाटलांचे परळी शहरातील बॅनर हटवले होते. त्यानंतर मराठा आंदोलकांनी मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठांमध्ये धाव घेतली होती. संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करत संवाद बैठकीसाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर आज कोर्टाने जरांगे पाटलांच्या संवाद बैठकीला परवानगी दिली आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी परळी शहरात आनंदोत्सव साजरा केला आहे. औरंगाबाद खंडपीठाने याचिकर्त्यांना दिलासा दिलाय आणि पोलिसांनी बैठकीला अटी शर्तींच्या अधीन राहून आयोजकांना परवानगी द्यावी असे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!