सोलापूर : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्यावर माजी मंत्री तथा रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका करत गंभीर आरोप केले. महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘शकुनी मामा’ अशी उपमा देत, महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांना तुरुंगात टाकण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप खोत यांनी केला.
सांगली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. खोत म्हणाले, जयंत पाटील यांच्या पांढऱ्या चेहऱ्यामागे ‘व्हाइट कॉलर’ गुन्हेगारी दडलेली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राजकीय सूडबुद्धीने कारवाया करण्याचे प्रयत्न झाले, असा दावा त्यांनी केला.
बागणी जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचा संदर्भ देताना खोत म्हणाले, “माझ्या सूनबाई मोहिनी खोत या विजयी झाल्या. मात्र प्रचारादरम्यान जयंत पाटील यांनी एकेरी उल्लेख करून टीका केली. भाषणांत शिवीगाळ करण्याचाही प्रकार घडला.”
मतदान गोपनीय असते; मात्र दोन दिवस आधी यंत्रणांचा वापर करून मोबाईलच्या माध्यमातून मतदारांचा कल जाणून घेण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला. “सर्व डेटा गोळा करून ज्यांनी नकार दर्शविला, त्यांना धमक्या देणे, आमिष दाखवणे असे प्रकार घडले,” असेही खोत म्हणाले. दरम्यान, या आरोपांवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. राजकीय वर्तुळात खोत यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.