मुंबई : वृत्तसंस्था
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार एयर स्ट्राइक करत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यात जवळपास 100 दहशतवादी ठार झाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पाकिस्तानने बुधवारी रात्री उशिरा भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये हल्ला केला. यात पुंछ येथे 15 नागरिकमृत्युमुखी पडले तर अनेक लोक जखमी झाले. याला भारताने जोरदार ड्रोन हल्ला करत प्रत्युत्तर दिले. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील दक्षता घेण्यात येत आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मंदिर प्रशासनाने येत्या रविवारपासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मंदिर प्रशासन पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती देणार असल्याचे समजते.
दरम्यान, भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. गुरुवारी रात्री साकिनाका परिसरात एक संशयास्पद ड्रोनसदृश वस्तू आकाशात दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तत्काळ कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. प्राथमिक माहितीनुसार, साकिनाका येथील एका धार्मिक स्थळाच्या वरती काही क्षणांसाठी एक ड्रोनसदृश वस्तू दिसली होती. त्यानंतर ती झोपडपट्टी भागाच्या दिशेने गेल्याचं काही नागरिकांनी सांगितले. ही माहिती सहार विमानतळावरून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली, आणि त्यानंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली आहे. आज दुपारी होणाऱ्या या बैठकीचा उद्देश सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेणे आणि राज्यभरातील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणे आहे. दरम्यान महाराष्ट्राला अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.