ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्राला इशारा : राज्यातील 14 जिल्ह्यांना आयएमडीचा यलो अलर्ट !

मुंबई : वृत्तसंस्था

यंदाच्या मान्सूनमध्ये अतिवृष्टी, पुर आणि अवकाळी पावसाने महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी खरीप हंगाम हातातून गेला, तर काही भागांत पुराचे पाणी घरात घुसल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले. पावसाचा धोका आता कमी झाला असला तरी राज्यावर आणखी एक संकट ओढावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागानुसार, पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्रात तापमानात लक्षणीय घट होणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती आयएमडीच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी दिली.

थंडीचा परिणाम होणारे जिल्हे –
मराठवाडा : जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर
विदर्भ : गोंदिया, नागपूर
उत्तर महाराष्ट्र : नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर
पश्चिम महाराष्ट्र : पुणे, सोलापूर

हवामान विभागाचे आवाहन : तापमानात मोठी घसरण होणार असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे हवामान विभागाने सुचवले आहे. विशेषत: ज्यांना श्वसनाच्या तक्रारी आहेत, अशांनी बाहेर पडताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर उत्तर भारतातही पुढील काही दिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज असून आगामी दिवसांत महाराष्ट्र गारठण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!