नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. पहलगाममधील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती हल्ल्यातील पीडितांनी दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
“दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का?” असे प्रश्न काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. यानंतर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले की, “विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट केलं जातं हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. मग काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार कोणत्या जगात वावरत आहेत “दहशतवाद्याला जात-धर्म नसतो” असं म्हणून वडेट्टीवार कोणाला खूश करू पाहत आहेत? काँग्रेस नेते दहशतवाद्यांना “निर्दोष” ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?”
पुढे ते म्हणाले, “विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे दहशतवाद्यांचा चेहरा झाकण्याचा, त्यांना संरक्षण देण्याचा किळसवाणा प्रयत्न दिसतो. हा केवळ बेजबाबदारपणा नाही, तर देशविरोधी मानसिकतेचं उदाहरण आहे. देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयानं वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करायला हवा. काँग्रेसचे नेते भारतीयांच्या भावनांशी खेळत आहेत, जखमांवर मीठ चोळत राजकारण करत आहेत, जनता हे विसरणार नाही,” असा हल्लाबोल बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्यावर केला.