नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बिकानेरमध्ये दिलेल्या भाषणाचा समाचार घेतला आहे. राहुल गांधी यांनी यावेळी “मोदीजी, पोकळ भाषणबाजी करणं बंद करा. अन् मला तुम्ही फक्त एक सांगा की तुम्ही दहशतवादाच्या पाकिस्तानच्या विधानावर का विश्वास ठेवला? असा सवाल उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल बिकानेरमध्ये होते. यावेळी त्यांनी सांगितले की, माझे मन थंड आहे पण माझ्या नसानसातून गरम रक्त वाहत आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुढे ते म्हणाले की,”मोदींच्या नसांमध्ये गरम सिंदूर वाहत आहे.” दुपारी भाषणादरम्यान पंतप्रधान म्हणाले की, “लष्कराने २२ एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला २२ मिनिटांत घेतला. जेव्हा सिंदूर बारूदमध्ये बदलतो तेव्हा काय होते हे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांनी पाहिले आहे.” तसेच पंतप्रधान म्हणाले की, “जे लोक सिंदूर पुसण्यासाठी बाहेर पडले होते ते मातीत मिसळले गेले आहेत.” असेही विधान यावेळी त्यांनी केले.
दरम्यान, पंतप्रधानांच्या याच भाषणावर राहुल गांधींनी निशाणा साधला. यासाठी त्यांनी एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी, “मोदीजी, पोकळ भाषणबाजी करणं बंद करा.” असे म्हटले. तसेच यासोबतच त्यांनी पंतप्रधान मोदींना तीन प्रश्न विचारले आणि लिहिले, ‘तुम्ही मला फक्त हे सांगा: १. दहशतवादाबाबत पाकिस्तानच्या शब्दांवर तुम्ही का विश्वास ठेवला? २. ट्रम्पसमोर झुकून तुम्ही भारताच्या हितांचा त्याग का केला? ३. तुमचे रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोरच का उकळते? तुम्ही भारताच्या सन्मानाशी तडजोड केली आहे का?असे सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले.
पंतप्रधान मोदींनी बिकानेरमध्ये सांगितले होते की, पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या गेल्या, पण त्या गोळ्यांनी १४० कोटी देशवासीयांच्या हृदयाला छेद दिला. देशातील प्रत्येक नागरिकाने एकजुटीने संकल्प केला होता की दहशतवाद्यांचा नायनाट केला जाईल. आमच्या बहिणींच्या केसांच्या विदाईतील सिंदूर नष्ट झाला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या सैन्याने असा चक्रव्यूह निर्माण केला की पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली. २२ तारखेला पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, २२ मिनिटांत ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. आपण सर्वांनी दहशतवाद्यांचा बदला घेण्याच्या आपल्या प्रतिज्ञेचे पालन केले आहे.