ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर : महाविकास आघाडीला केले लक्ष !

मुंबई : वृत्तसंस्था

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले असून या दौऱ्यात त्यांच्या हातून अनेक विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन समारंभानंतर पंतप्रधान मोदींनी सवांद साधला आहे.

“नवी मुंबईचे प्रदीर्घ काळाचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मुंबईला अखेर दुसरे विमानतळ मिळाले आहे. तसेच या शहराला भूमिगत मेट्रोही मिळाली आहे. भूमिगत मेट्रो हा विकसित भारताचे चित्र आहे. या विकास कामात योगदान देणार्‍या सर्वांचे मी अभिनंदन करतो. नवी मुंबई विमानतळ हे समृद्धी आणि विकासाचे प्रतीक ठरेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.८) व्‍यक्‍त केला. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन समारंभानंतर ते बोलत होते.

नवीन विमानतळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी मध्य पूर्व आणि युरोपातील बाजारपेठांशी जोडले जातील. यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आणि नवीन व्यवसाय आकर्षित होतील. या विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करतो.महाराष्ट्राचे सुपूत्र दि. बा. पाटील यांचेही स्मरण करतो. त्यांचे कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
हवाई चपल घालणाराही हवाई सफर करणार

विकसित भारताचे काम वेगाने सुरू आहे. जेव्हा पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होत असते तेव्हा भारताचा वेग दिसून येतो.२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर हवाई चपल घालणाराही हवाई सफर करणार, अशी ग्वाही मी दिली होती. यासाठी आम्‍ही प्रयत्नशील राहिलो. २०१४ मध्ये देशात केवळ ७४ विमानतळ होते. आज देशात १६० पेक्षा जास्त विमानतळे आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

आज कौशल्य विकास संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. सध्याचा काळ हा देशातील तरुणाईला विविध संधी उपलब्ध करून देणार आहे. संपूर्ण देश हा विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही पंतप्रधान मोदी म्‍हणाले. विजयादशमी झाली, कोजागिरी झाली, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा, अशा मराठीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना दिवाळीच्‍या शुभेच्छा दिल्या.

मुंबई ही केवळ आर्थिक राजधानीच नाही तर भारतातील सर्वात गतिमान शहरांपैकी एक आहे. २००८ मध्ये दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केल्यामुळेच हे घडले. परंतु तत्कालीन काँग्रेस सरकारने कमकुवतपणाचा संदेश दिला. अलिकडेच, एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने आणि माजी गृहमंत्र्यांनी खुलासा केला आहे की, मुंबई हल्ल्यानंतर आमचे सुरक्षा दल पाकिस्तानवर हल्ला करण्यास तयार होते, परंतु दुसऱ्या देशाच्या दबावामुळे, त्यावेळच्या काँग्रेस सरकारने आमच्या सुरक्षा दलांना थांबवले. काँग्रेसने हे सांगायला हवे की परदेशी शक्तीच्या दबावाखाली हा निर्णय कोणी घेतला?, काँग्रेसच्या कमकुवतपणामुळे दहशतवाद्यांना बळकटी मिळाली. देशाला वारंवार जीवांचे बलिदान देऊन या चुकीची किंमत मोजावी लागली आहे. आमच्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा आणि आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा काहीही महत्त्वाचे नाही, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्‍पष्‍ट केले. सध्‍याचा भारत हा घरात घुसून मारणारा आहे. नुकतेच भारताने राबवले ऑपरेशन सिंदूर त्‍याचे उदाहरण असल्‍याचेही पंतप्रधान माेदी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!