मुंबई : राज्यात विधानसभा अध्यक्ष पदाचा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्ष पदाचा निवडणूक घ्यावे असे पत्र लिहिल्या नंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
दुसरीकडे अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत होत नसल्याचे दिसून आले आहे. यामध्ये काँग्रेसकडून दोन नावे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुण्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर आहेत.
महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचं सांगितले जात आहे.
दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने २३ जून रोजी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे तीन प्रमुख मागण्या केल्या होत्या. यामध्ये विधानसभा अध्यक्ष पदाचा देखील समावेश होता. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार असे विचारल्याने यावरून राज्यात पुन्हा राजकारण सुरू झाली आहे.
विधानसभा अध्यक्ष पदी कोण बसेल याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे हंगामी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी हे घेतील. लवकरच विधानसभा अध्यक्षाची घोषणा केली जाईल अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.