ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धनंजय मुंडेंच्या विधानावरून नवा वाद : बंजारा समाज आक्रमक !

बीड : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापृवी राज्यातील अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले होते त्यानंतर त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता पुन्हा एकदा त्यांचे विधान चर्चेत आले असून ते देखील अडचणीत येण्याची मोठी शक्यता आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढला. मात्र यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या निर्णयामुळे पुरावे असलेल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मात्र आता हैदराबाद गॅझेटनुसार आमचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी आता बंजारा समाजाकडून करण्यात आली आहे. कारण हैदराबाद गॅझेटनुसार काही ठिकाणी बंजारा समाजाची नोंद ही एसटी प्रवर्गामध्ये आहे. परंतु बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध होत आहे.

दरम्यान, आपल्या मागण्यांसाठी बंजारा समाजाच्या वतीनं राज्यात विविध ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आहे. बीडमध्ये निघालेल्या या मोर्चात माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी बंजारा आणि वंजारा एकच असल्याचे म्हटले. या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. येथील सभेतच बंजारा समाजातील तरुणांनी मुंडेंच्या वक्तव्याचा विरोध केला आहे.

वंजारा बंजारा एक नसून, या अगोदरच तुम्ही आमच्या ताटातले अडीच टक्के आरक्षण घेतले आहे. वंजारा- बंजारा एक आहे हा शब्द मागे घ्या, अशी मागणी करत बंजारा समाजाने घोषणाबाजी सुरू केली. यामुळे बंजारा आणि वंजारा एक या विधानावरून धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दुसरीकडे, बंजारा समाजाचे नेते आणि दिवंगत गोपीनाथ मुंडेंसमवेत काम केलेल्या हरिभाऊ राठोड यांनीही धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा विरोध दर्शवला आहे. बंजारा वंजारी हे एक नाहीत, मी गोपीनाथ मुंडे यांचा खासगी सेक्रेटरी असताना देखील ही भूमिका घेतली होती. आपण भाऊ-भाऊ आहोत, सामाजिकदृष्ट्या ठीक आहे. मात्र, आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला वेगळं आरक्षण दिले पाहिजे. यापूर्वीच मी ही बाब सांगितली आहे. त्यामुळे, तो फॉर्मुला आत्ता वापरायला नको,” असे मत हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केले.

राज्यात हैदराबाद गॅझेटचा जीआर काढल्यानंतर बंजारा समाज आक्रमक झाला आहे. बंजारा समाजाचा समावेश हा एसटी प्रवर्गात करावा अशी मागणी बंजारा समाजाकडून करण्यात आली आहे. मात्र या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे आदिवासी समाज आणि बंजारा समाज आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!