नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील बहुतेक कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांसाठी जबाबदार असल्याने त्यावर पुन्हा बंदी घालण्यात यावी तसेच हे माझे वैयक्तिक मत आहे,” असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या विधानाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी मत व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी, “माझे वैयक्तिक मत असे आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी.”असे म्हटले. त्यासोबतच “देशातील बहुतेक कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप जबाबदार आहेत” असा दावा खरगे यांनी केला.
काँग्रेस अध्यक्षांनी असाही दावा केला की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी खोट्या गोष्टींना सत्यात रूपांतरित करण्यात पटाईत आहेत”. ते म्हणाले की, “पटेल यांनी भारताच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही चारित्र्याचे रक्षण करण्यासाठी संघावर बंदी घातली”. खरगे म्हणाले, “जर तुम्ही (भाजप) प्रत्येक गोष्टीसाठी काँग्रेसला दोष देत असाल तर तुमच्या स्वतःच्या कृतींकडे पहा.” खरगे म्हणाले, “तुम्ही सत्य कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी ते पुसले जाणार नाही.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “ते (पंतप्रधान आणि भाजप) नेहमीच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात दरी दाखवण्याचा प्रयत्न करतात, तर नेहरू आणि पटेल यांचे खूप चांगले संबंध होते आणि पटेल यांनी नेहरूंना लोकनेते म्हणून वर्णन केले होते.” ते म्हणाले, “मी भाजपला सांगू इच्छितो की दहीहंडीत खडे शोधू नका. सर्वांना तुमचा इतिहास माहित आहे. गुजरातमध्ये पटेलांच्या पुतळ्याचे अनावरण करणारे आणि सरदार सरोवर धरणाची पायाभरणी करणारे नेहरू हे पहिले होते.