नागपूर : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून अनेक राजकीय चर्चेला उधान सुरु झाले असून आता यावर भाजपचे नेते व मंत्री बावनकुळे यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. आमच्या पक्षाकडून त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी कौटुंबिक एकत्र यावे, एकत्र लढावे, राजकारणातही एकत्र यावे, आमचे त्याबद्दल काही ना नाही. राज साहेब आणि उद्धव साहेब वेगळे का झाले, तर राजकीय कारणांमुळे. राजकारणात त्यांचे पटले नाही म्हणून वेगळे झाले. आता राजकारणात त्यांचे पटायला लागले म्हणून एकत्र आले. त्यात आमचा बोलण्याचा काय अधिकार आहे? असा प्रश्नही उपस्थित करत भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आरक्षण उपसमितीची पहिली बैठक पार पडली आहे. यावर माहिती देताना बावनकुळे म्हणाले, इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींवरील करावयाच्या कार्यवाहीबाबत माझ्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ व समितीची बैठक मंत्रालयातील माझ्या दालनात झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यापूर्वी गणेश उत्सवाच्या निमित्ताने उद्धव हे राज यांच्या घरी गेले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा ते त्यांच्या घरी गेलेत. या भेटीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. आगामी महापालिकेच्या अनुषंगाने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्या पासून सुरू झाल्या होत्या. या चर्चांना आता आणखी बळ मिळताना दिसत आहे. दरम्यान, आजच्या भेटीच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत तसेच अनिल परब देखील सोबत होते. त्यामुळे आगामी स्थानी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह संभाव्य राजकीय आघाडीवर चर्चा सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे.