मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून भाजपचे नेते आ.पडळकर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर विखारी टीका करीत असल्यामुळे मोठ्या चर्चेत असताना आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत आयोजित सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांना उघडपणे टोले मारत मोठे वक्तव्य केले आहे. गोपीचंद पडळकर यांनी आधीच जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर टीका केल्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी त्यावरून वक्तव्य केले. पाटील यांनी सांगितले की, जर जयंत पाटील भाजपत आले तर सांगली जिल्ह्यात पडळकरच सीनियर राहतील आणि जयंत पाटील ज्युनियर म्हणून मागे बसतील. तसेच पडळकरांच्या समर्थनार्थ जयंत पाटीलांना घोषणाबाजी करावी लागेल.
पाटील यांनी आपल्या भाषणात पाच वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या चौकशीची जबाबदारी घेतली पाहिजे असे ठरवण्याचा इशारा देत म्हटले की, आम्ही रावण जाळून या विकृतीचा नाश करीत आहोत; उद्यापासून सांगली जिल्ह्यात शांतता पाहिजे. पण आम्हाला हलक्यात घेऊ नका. त्यांनी सांगली जिल्हा बँकेच्या घोटाळ्यापासून ते लॉटरी ऑनलाईन घोटाळा व सर्वोदय कारखान्याच्या ताब्यापर्यंत पाच प्रकरणे उघड करण्याचा इशारा दिला. चंद्रकांत पाटील म्हणाले की, या सर्व प्रकरणांची चौकशी सुरु केली तर काहीजणांना आपल्या गावातून पळून जावं लागतील, कारण त्यांना जेलची भीती वाटेल. राजकीय चर्चेतून पाटील यांनी आक्रमक भाषण करत प्रत्यक्ष नाव न घेता विरोधकांवर तीव्र आरोप केलेत. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, जयंतरावांचा फोन आला; मी जाहीरपणे बोलतो, मी कोणाला घाबरत नाही.
जतमध्ये आयोजित दसरा मेळाव्यात जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधीच समज दिल्यानंतरही पडळकरांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत राजकीय वातावरण तापवले आहे. तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं? असा सवाल करत त्यांनी जयंत पाटलांना थेट आव्हान दिले होते. जातीवंत पाटील असाल तर वेळ, तारीख आणि ठिकाण सांगा, मी तिथे हजर राहतो, असेही पडळकर म्हणाले होते. या भाषणात पडळकरांनी आक्षेपार्ह भाषा वापरत जयंत पाटलांसोबतच त्यांच्या निकटवर्तीय दिलीप पाटील यांच्यावरही टीका केली होती. त्यांनी दिलीप पाटील यांचा वाळव्याचा कुत्रा असा उल्लेख केला होता.