मुंबई वृत्तसंस्था : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पतंजली फूड्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये सध्या जोरदार तेजी पाहायला मिळत असून, अवघ्या काही दिवसांत गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे. १५ डिसेंबरपासून पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये सुमारे ७ टक्क्यांची वाढ झाली असून, यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास ३,९०० कोटी रुपयांची भर पडली आहे.
शेअर्समधील या तेजीमुळे पतंजली फूड्सचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) ६१ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. शुक्रवारी शेअर बाजारात पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये २.७५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. दुपारी १२.५० वाजता कंपनीचा शेअर १.२० टक्के वाढीसह ५५८.३० रुपयांवर व्यवहार करत होता, तर व्यवहार संपेपर्यंत तो ५६६.८५ रुपयांवर बंद झाला.
महत्त्वाचे म्हणजे, हे दर शेअरच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीपेक्षा १३ टक्क्यांहून अधिक आहेत. शुक्रवारी व्यवहाराच्या सुरुवातीला शेअर ५०० रुपयांच्या आसपास घसरलेला दिसला होता, मात्र त्यानंतर खरेदीचा ओघ वाढल्याने शेअरने पुन्हा उसळी घेतली.
बीएसईच्या आकडेवारीनुसार, १५ डिसेंबर रोजी पतंजली फूड्सचा शेअर ५३१.२० रुपयांवर बंद झाला होता. अवघ्या चार दिवसांत तो ५६६.८५ रुपयांपर्यंत पोहोचला असून, या कालावधीत सुमारे ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. जरी मागील एका महिन्यात शेअरमध्ये ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती, तरी गेल्या सहा महिन्यांत शेअरने २ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दर्शवली आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठीही हा शेअर फायदेशीर ठरला असून, मागील पाच वर्षांत पतंजली फूड्सने तब्बल ६१ टक्के परतावा दिला आहे.
शेअर्समधील या सातत्यपूर्ण वाढीमुळे कंपनीचे बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. १५ डिसेंबर रोजी कंपनीचे मूल्यांकन ५७,७८५.४४ कोटी रुपये होते, जे १९ डिसेंबरच्या व्यवहार सत्रात वाढून ६१,६६३.५४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच अवघ्या काही दिवसांत गुंतवणूकदारांना सुमारे ३,८७८ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.