मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या मंत्री व आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाला असून आता राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वादग्रस्त प्रकरणावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट निशाणा साधला आहे. सत्ता असते म्हणून तुम्ही निर्भीड पत्रकारांना तुरुंगात टाकता, न्याय मागणाऱ्या महिलेला गुन्हेगार ठरवता, आणि आता विरोधकांनाही त्रास देता? हीच सत्ता उद्या हातातून गेल्यावर काय अवस्था होईल याचं भान ठेवा, अशा शब्दांत रोहित पवारांनी मंत्री जयकुमार गोरेंवर टीका केली आहे.
रोहित पवार म्हणाले, रामराजे साहेबांसारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याच्या घरी पोलिस पाठवून त्यांना त्रास देण्यामागचे राजकारण काय आहे हे जनतेला समजतंय. ही चौकशी आहे की सूडाची कारवाई?, असा सवाल जयकुमार गोरे यांच्या खंडणी व बदनामी प्रकरणात आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर वडूज पोलिसांकडून चौकशी करण्यात आली यावर बोलताना रोहित पवारांनी केला आहे.
तुषार खरात या पत्रकाराने गोरे प्रकरण उघडकीस आणले आणि लगेच त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला. याकडे लक्ष वेधत रोहित पवार म्हणाले, जे खरे बोलतात, लिहितात त्यांना तुरुंगात टाकायचे, ही कुठली लोकशाही आहे? हा सत्तेचा उन्माद आहे.
रोहित पवार म्हणाले की, एका महिलेने जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केल्यावर तिच्यावरच गुन्हा दाखल होतो, हे हास्यास्पद आहे. सत्ता असते म्हणून अशी दडपशाही करता, पण ही सत्ता सदासर्वकाळ टिकत नाही. उद्या सत्तांतर झाले तर काय होईल, याचा विचार करा. रोहित पवारांनी ट्विट करत म्हटलंय की, सत्तेचा आणि पदाचा गैरवापर कसा असतो हे मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात दिसत आहे. पदाचा गैरवापर करत न्याय मागणाऱ्या पिडीतेलाच जेलमध्ये टाकून आणि सत्य उजेडात आणणारे निर्भिड व खरे पत्रकार तुषार खरात यांना खोट्या गुन्ह्यात अडकवूनही या मंत्र्यांचं समाधान झाल्याचं दिसत नाही. म्हणूनच विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर साहेब यांना चौकशीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. पण सत्ता ही सदासर्वकाळ नसते… आजची सत्ता उद्या जाईल त्यावेळी आपली काय अवस्था होईल, हे आज सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी विसरु नये.