मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा सुरु असतांना आता मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटीला वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीच्या निकालानंतर ही भेट होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. परंतु राज ठाकरे यांनी फडणवीसांसोबत नागरिकांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या उत्कर्ष पॅनलला 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. पहिल्यांदाच एकत्र आलेल्या या युतीला शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत मात दिली, तर महायुतीच्या समृद्धी पॅनलला सात जागांवर समाधान मानावे लागले.
मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येत असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.