ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तब्बल १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच राज- उद्धव यांचं संयुक्त पत्र !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण घडताना दिसतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू प्रथमच एका संयुक्त निमंत्रणपत्रिकेवर एकत्र झळकले आहेत. खासदार संजय राऊत यांनी हे पत्र आज (दि.१) त्यांच्या ट्विटवरून यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे.

गुरूवार, ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता, मुंबईच्या वरळीतील NSCI डोम येथे आयोजित ‘विजयी जल्लोष मेळावा’ या कार्यक्रमासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे निमंत्रण दिलं आहे. हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर महाराष्ट्रभर मराठी भाषिकांमध्ये आनंदाची लाट उसळली असून, या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित केला जात आहे.

या मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या नेत्यांकडून आज रात्री ९.३० वाजता NSCI डोम येथे पाहणी करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, राजकीय संघर्षाच्या अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार आहेत, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

आम्ही वाट बघतोय : राज- उद्धव ठाकरे

संयज राऊत यांनी शेअर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, “मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं! कोणी नमवलं? तर तुम्ही – मराठी जनतेनं! आम्ही केवळ तुमच्या वतीने संघर्ष करत होतो.” “आता आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे. आम्ही आयोजक आहोत, पण जल्लोष तुम्हालाच करायचा आहे. वाजत-गाजत, गुलाल उधळत या – आम्ही वाट बघतोय!”

सरकारच्या हिंदी सक्तीच्या राज्यभरातील विरोधानंतर दोन जीआर रद्द करण्यात आले. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. यानंतर मराठी माणसाच्या विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याला दोन्ही ठाकरे बंधूंची उपस्थित महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे हा मेळावा केवळ विजयाचा जल्लोष आहे की भविष्यातील संयुक्त राजकीय समीकरणांची नांदी? याकडे आता अख्या महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!