मुंबई : वृत्तसंस्था
देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर ते ‘गायब’ झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत म्हणाले की, धनखड यांना त्यांच्या राहत्या घरी ‘हाऊस अरेस्ट’ केले असल्याची शक्यता असून, विरोधकांना गायब करण्याची ही चीन आणि रशिया सारखी पद्धत भारतात सुरू झाली असेल, तर राहुल गांधी यांच्यासह सर्वांनीच सावध राहायला हवे. या घटनेमुळे भारताची राजकीय व्यवस्था बिघडल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या राम रहीम बाबा यांना पुन्हा ‘पॅरोल’वर सोडण्यात आले. या दोन्ही घटनांवरून देशातील राजकीय व्यवस्था पूर्णपणे बिघडल्याचा आरोप करत, राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
संजय राऊत म्हणाले की, जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून ते कोणाच्याही संपर्कात नाहीत. देशाच्या माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा माहीत नसणे, ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. धनखड यांना त्यांच्या राहत्या घरी ‘हाऊस अरेस्ट’ केले असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात असून, ते खरे वाटते. राऊत यांनी आरोप केला की, आपल्याला नको असलेले विरोधक गायब करण्याची, तुरुंगात डांबण्याची पद्धत चीन आणि रशियासारख्या कम्युनिस्ट देशांत आहे. भाजपचे भीष्म पितामह लालकृष्ण आडवाणी यांनाही अशाच प्रकारे गप्प केले गेले.
संजय राऊत म्हणाले की, बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या राम रहीम बाबा यांना भाजप सरकारच्या कृपेने वारंवार पॅरोल मिळत असल्याचा मुद्दाही राऊत यांनी उपस्थित केला. निवडणुका आल्या की, ते पॅरोलवर बाहेर येतात आणि भाजपला मतदान करण्याचे फर्मान त्यांच्या शिष्यांना देतात. राम रहीम बाबा वाढदिवस साजरा करायला तुरुंगातून बाहेर येतात, पण देशाचे माजी उपराष्ट्रपती मात्र गायब आहेत. हे कायद्याचे आणि न्यायव्यवस्थेचे अधःपतन असल्याचे राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्ध आपण थांबवल्याचा दावा अनेकदा केला. यावर पंतप्रधान मोदी यांनी एकदाही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या या मौनातच युद्धबंदीचे रहस्य दडलेले असल्याचा आरोप राऊत यांनी केला. मोदी हे भाजप खासदारांसमोर आक्रमकपणे बोलतात, पण ट्रम्प यांच्या भारतविरोधी वक्तव्यांपुढे ते नांगी टाकतात, असेही राऊत म्हणाले. ‘स्वदेशी’चा नारा देणारे मोदी स्वतः मात्र महागड्या विदेशी वस्तू वापरतात, असा आरोपही त्यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपच्या प्रवक्ता आरती साठे यांची थेट मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याचा मुद्दाही राऊत यांनी उपस्थित केला. भाजपने जाहीर केलेल्या प्रवक्त्याच्या यादीत त्यांचे नाव असतानाही त्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती केली गेली. यामुळे न्यायव्यवस्थेवर भाजपचा ताबा वाढत असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. उद्या मोदींचा भाजप सत्तेवरून गेला तरी देशाच्या न्यायव्यवस्थेवर त्यांचा ताबा राहील, अशी भीतीही राऊत यांनी व्यक्त केली.