अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात सध्या काही अंशी कोरोना नियंत्रणात आला आहे. अशा स्थितीमध्ये गावोगावी रॅपिड अँटीजन टेस्टला सुरुवात केली असल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली.
अक्कलकोट तालुक्यात सध्या कोरोना पाॅजिटिव्ह रुग्ण संख्या व मृत्यू प्रमाण कमी होऊन दुसरी लाट ओसरत असतानाही तालुका प्रशासन मात्र उपाय योजनेबाबत कुठली ढिलाई न करताना पूर्वी प्रमाणेच तालुक्यात कडक उपाययोजना करताना दिसून येत आहेत. आता तालुक्यात वैद्यकीय विभागाकडून २६ जूनपर्यंत गाव निहाय टेस्टिंग मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेत वैदयकीय पथक गावपातळीवर जाऊन गावातील ग्रामस्थांची रॅपिड व आरटीपीसीआर टेस्टिंग मोहिम राबवित आहे. यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने गाव निहाय स्वतंत्रपणे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी तिसरी लाट थोपविण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न होताना दिसून येत आहे.
या टेस्टिंग मोहिमेंतर्गत तालुक्यातील एकूण १०३ गावातील ग्रामस्थांची चाचणी करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जेऊर आरोग्य विभागाच्यावतीने हंजगी येथे गाव कोरोना समिती सचिव भिमराव गुरव यांच्या नेतृत्वाखाली टेस्टिंग मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत रॅपिड टेस्ट बरोबरच आरटीपीसीआर टेस्टिंग करण्यात आली.
या मोहिमेला गावपातळीवरील गाव कोरोना समिती अध्यक्ष, सचिव, पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना मदत करण्याचे आवाहन तालुका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. जर या मोहिमेला प्रत्येकाने साथ दिली तर तालुका कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास तहसीलदार मरोड यांनी व्यक्त केला.