मुंबई : वृत्तसंस्था
अजितदादा पवार विमान अपघात प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आज रोहित पवार यांचा FIR दाखल करून घेतला नाही, ज्यामुळे राजकीय वर्तुळात वाद उफाळून आला आहे. रोहित पवार, अमोट मिटकरी, अजित दादां आणि शरद पवार यांच्या काही राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांसह FIR नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते; मात्र पोलिसांनी तक्रार स्वीकारण्यास नकार दिला.
रोहित पवार म्हणाले की, “सुरुवातीला आमचा वादविवाद झाला. पोलिसांनी लॅपटॉप आणला आणि माझं स्टेटमेंट टाइप करायला सुरुवात झाली, मात्र एका मोठ्या अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपामुळे FIR नोंदवण्यापासून आम्हाला रोखले. कोणाचा फोन आला? कोण अडथळा आणत आहे? असा संशय आमच्यात आहे.”
ते पुढे म्हणाले, “आमच्याकडे राज्य सरकारनं आणलेल्या नव्या कायद्यानुसार FIR दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. उद्या सकाळी दहा वाजता बारामतीमध्ये FIR दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहोत; तिथंही नोंद न झाल्यास न्यायालयात जाणार आहोत.”
रोहित पवार यांनी पोलिस प्रशासनावरही थेट आरोप केले. “विखे-पाटील, आशिष शेलार, साताऱ्याचे मंत्री यांचे ट्रोलर ट्रोल करत आहेत. पोलिस FIR नोंदवत नाहीत; कुणाच्या पाठिंब्याशिवाय असे मग्रुरी होऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या आमदारांनाही न्याय मिळत नसेल, तर सामान्य जनतेला न्याय कसा मिळणार?”
राज्यातील उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात घातपातामुळे झाला असल्याचे स्पष्ट पुरावे असूनही FIR नोंदवण्यात पोलिसांचा विलंब, आणि विमान कंपनी VSR ला क्लीनचिट देण्याचा प्रयत्न होत असल्याचा रोहित पवार यांनी आरोप केला. “पोलिस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत, हे जनतेला समजायला हवे,” असे ते म्हणाले.
मुंबई पोलिसांनी तरीही सांगितले आहे की, रोहित पवारांनी दिलेली तक्रार स्वीकारली असून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. मात्र, प्रकरणात घातपाताचा संशय असतानाही पोलिसांची टाळाटाळ आणि विलंबित पद्धत, नागरिकांमध्ये गंभीर चिंता निर्माण करत आहे.