दौंड : प्रतिनिधी
“मरावे परी कीर्ती रुपे उरावे” या विचाराने प्रेरित होऊन अवयवदान चळवळीला संजीवनी देणारी घटना हिंगणीगाडा (ता. दौंड) येथे नुकतीच घडली. नुकत्याच एका अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या गावातील युवक कै. अविनाश संभाजी खराडे यांनी मृत्यूनंतर चार जणांना जीवनदान दिले.
स्व.सौ. रोहिणी जाधव स्मारक ट्रस्ट, दौंड यांच्या वतीने जागतिक अवयवदान दिनाच्या (१३ ऑगस्ट) निमित्ताने या दानशूर कार्याचा गौरव करत त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानपत्र देण्यात आले. अविनाश यांचे वडील संभाजी खराडे, आई सविता खराडे, बंधू स्वप्नील, बहिण प्रगती व इतर नातेवाईकांनी अत्यंत धैर्याने समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले.
ही घटना दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिलीच असल्याची माहिती ट्रस्टने दिली. ट्रस्टतर्फे स्मशानभूमीबाहेर अवयवदान जनजागृतीसाठी माहिती फलकही उभारण्यात आला आहे. अवयवदानाबाबत अजूनही शहरी व सुशिक्षित लोकांमध्येही अपुरी माहिती आहे. पुणे विभागात सुमारे १० हजार रुग्ण प्रतिक्षेत असून, गेल्या साडेचार वर्षांत फक्त २६७ मेंदूमृत व्यक्तींमधून ६८५ अवयव प्रत्यारोपण झाले आहेत. अवयवदानाची प्रक्रिया सुलभ करून आणि शासकीय रुग्णालयांतही सुविधा उपलब्ध करून दिल्यास ही चळवळ व्यापक होऊ शकते, असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. तसेच दात्यांच्या कुटुंबीयांना शासनाने मदत द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र जाधव, डॉ. सुभाष पानसरे, डॉ. राजेंद्र माने, डॉ. प्रेमकुमार भट्टड, डॉ. महेंद्र मुनोत, सज्जन काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.