मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता मावळ विधानसभा मतदारसंघातील आमदार सुनील शेळके यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत परवानगी न घेता दगड आणि खाणींचे बेकायदेशीर उत्खनन केले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र देखील पाठवले आहे. यामध्ये त्यांनी या संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सुनील शेळके यांनी उत्खनन केलेल्या क्षेत्रांमध्ये सरकारची हजारो कोटींची रॉयल्टी बुडाली आहे. त्याची भरपाई तुम्ही कशी करणार आहात? याबाबत त्वरीत आदेश देण्यात यावे, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी शेळके यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
इतकेच नाही तर भूसंपादन करताना आमदार सुनील शेळके यांना बदली जमीन देण्यात आली आहे. मात्र हा न्याय केवळ त्यांच्यासाठीच का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. अनेक शेतकऱ्यांची राहती घरे आणि बागायती जमीन आपण घेत आहात. त्यांना देखील बदली जमीन देणार आहात का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
या संदर्भात संजय राऊत यांनी पत्रात म्हटले की, सुनील शंकरराव शेळके, आमदार मावळ यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून सदर औद्योगिक क्षेत्रामध्ये आंबळे येथील श्री. सुनील शंकरराव शेळके व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या गट क्र. १२३,१२५, १४९,१५२,१५३/१,१५४,१५८.१७१/२ व १९५ अशा २९ हेक्टर ८६.१० आर क्षेत्रावर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने शासन निर्णय (१९६१ च्या प्रकरण ६) काढून सदरच्या जमिनी संपादन करत आहेत व तसेच श्री. सुनील शंकरराव शेळके, आमदार मावळ यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर दगड खाणीचे बेकायदेशीर उत्खनन केले आहे, त्याबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी शासनाकडे भरलेली नाही. त्या शेजारी अनेक क्रशर उद्योजकांच्या खाणी आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांनी श्री. सुनील शंकरराव शेळके व त्यांचे बंधू श्री. सुदाम शंकरराव शेळके यांनी दि. ३१/०७/२०२३ रोजी केलेल्या अर्जानुसार संपादन जागेच्या बदल्यात पर्यायी क्षेत्र मिळणे बाबत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे मागणी केलेली होती. परंतु वरील सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गौण खनिज उत्खनन केलेले आहे. जवळजवळ १०० फुटांचे खोल मोठे खड्डे केलेले आहेत. सदर जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळास वापरण्यासाठी योग्य नाही असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.