ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पहाटेच्या सुमारास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन !

लातूर : वृत्तसंस्था

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर (वय 91) यांचे लातूर येथे आज पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. लातूर येथील त्यांचे निवासस्थान देवघर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. ते लातूरचे नगराध्यक्ष होते. नगराध्यक्ष ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास अचंबा वाटावा असाच आहे. लातूर येथील विधी महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून काम केले होते. काँग्रेसकडून राष्ट्रपती पदासाठी त्यांचे नाव निश्चित झाले होते, ऐनवेळी प्रतिभाताई पाटील यांचे नाव पुढे आल्याने त्यांची संधी हुकली होती. सर्वच पक्षात त्यांचा सन्मान होता. लातूर येथे ते भाजपचे डॉ. गोपाळराव पाटील यांच्या विरोधात खासदारकीची निवडणूक लढवत होते. अटल बिहारी वाजपेयी यांची लातूरात सभा झाली होती, त्यावेळी वाजपेयी यांच्या तोंडून शिवराज पाटील अच्छे आदमी है, असे विधान केले होते. ती निवडणूक पाटील यांनी जिंकली होती.

शिवराज पाटील चाकूरकर यांचा जन्म साध्या शेतकरी कुटुंबात. कुटुंबाची आर्थिक स्थिती मर्यादित असली तरी शिक्षणाबाबत घरात नेहमी सकारात्मक वातावरण होते. लहानपणापासूनच शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणा या मूल्यांचा त्यांच्या स्वभावावर खोलवर परिणाम झाला. ग्रामीण भागातील सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांनी शिक्षणाची वाटचाल केली, पण शैक्षणिक गुणवत्तेबाबत ते सदैव कटाक्षाने प्रयत्नशील राहिले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चाकूर तालुक्यातील स्थानिक शाळांमधून पार पडले. महाविद्यालयीन काळात त्यांना सामाजिक कामांची विशेष आवड निर्माण झाली. युवक मंडळे आणि विद्यार्थी संघटनांमध्ये काम करताना नेतृत्वाची ताकद त्यांच्यात विकसित झाली. ग्रामीण भागातील बेरोजगारी, पायाभूत सुविधांची कमतरता आणि शिक्षणात जाणवणाऱ्या अडचणी त्यांनी जवळून पाहिल्या. याच काळात समाजासाठी काहीतरी करायचे हे ध्येय त्यांच्या मनात घट्ट रुजले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!