मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे तर गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीत बिघाडी तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सत्तेत सोबत जाण्याच्या बातम्या समोर आल्या होत्या तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संवाद साधला. दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. फडणवीसांसोबत परभणी आणि बीड प्रकरणांतील संदर्भात चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी नाही, असेही शरद पवार म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याची चर्चा रंगत आहे. कारण एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले जात आहे. शरद पवार यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निवडणुकीतील कामाचे कौतुक केले होते. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाली. पण ही चर्चा महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
पुणे दिल्ली साहित्य संमेलनातील भाषणांचा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मी येथे येण्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बीड आणि परभणी येथील परिस्थितीवर चर्चा झाली. हा भाग शांत झाली पाहिजे. आमचे राजकीय विचार वेगळे असले तरी महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी नाही. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, संकट येतात मात्र तुम्ही जागृत असाल हवे. संकटाच्या काळात लोक सहकार्य आणि साथ देत असतात. गेले काही दिवस महाराष्ट्रात अस्वस्थ वातावरण दिसत आहे. बीड, परभणी कसे शांत करता येईल, हे पहिले पाहिजे. अशांत महाराष्ट्र असे चित्र राज्यात होवू द्यायचे नाही.