मुंबई : वृत्तसंस्था
मुंढवा येथील 1800 कोटी रुपयांच्या महार वतन जमिनीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी नवे वळण आले असून या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी यांनी स्फोटक दावा केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली आहे. तेजवानी यांच्या म्हणण्यानुसार, 2021 पासूनच संपूर्ण व्यवहार पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली होता; मात्र प्रकरण अंगाशी आल्यानंतर जबाबदारी मध्यस्थांवर ढकलण्यात आली.
मुंढवा येथील सुमारे 1800 कोटींच्या महार वतन जमिनीची खरेदी अवघ्या 300 कोटी रुपयांत करण्यात आल्याचा आरोप अमेडिया कंपनीवर आहे. आरोपांची राळ उठल्यानंतर संबंधित सौदा रद्द करण्यात आला. त्यानंतर शीतल तेजवानी आणि अन्य एका कथित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय कुंभार यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “शीतल तेजवानींचा आरोप असा आहे की, माझ्याविरुद्धचे प्रकरण हे अंगाशी आल्यानंतर आखलेला सुटकेचा डाव आहे. 2021 पासून हा व्यवहार अमेडियाच्या नियंत्रणात होता. 2021 मधील पॉवर ऑफ अटर्नी (PoA) सर्व संबंधित पक्षांना पूर्ण माहिती असताना करण्यात आली. प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे जाणीवपूर्वक दडवण्यात आली. माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर दस्त रद्द करण्याचा दावा दाखल करण्यात आला.”
तेजवानींच्या मते, व्यवहार धोक्यात आल्यानंतर जबाबदारी मध्यस्थावर ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. “2021 च्या PoA पासूनच पार्थ पवार यांना वस्तुस्थितीची पूर्ण माहिती होती,” असा दावा त्यांनी केल्याचे कुंभार यांनी नमूद केले.
दरम्यान, तेजवानी यांनी BNSS कलम 379 चा आधार घेत फिर्यादीवर न्यायालयाची दिशाभूल आणि न्यायप्रक्रियेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, अमेडिया कंपनीने मालकी हक्काबाबत आपली फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. संबंधित जमीन कायदेशीररित्या हस्तांतरित होऊ शकत नव्हती आणि री-ग्रँट नाकारल्याची माहिती लपवण्यात आल्याचा आरोप कंपनीकडून करण्यात आला आहे. तथापि, 2025 मध्ये “स्वच्छ टायटलची खात्री” मिळाल्यानंतरच खरेदी नोंदणी करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.