मुंबई : वृत्तसंस्था
“हा देश संविधानावर चालवायचा की मनुस्मृतीवर – याचा निर्णय आता जनतेने घ्यावा लागेल,” असे ठाम मत व्यक्त करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाला राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘भागीदारी न्याय संमेलन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले, “देशातील मागासवर्गीय, ओबीसी आणि शोषित घटकांचे हक्क जर अबाधित ठेवायचे असतील, तर संविधानावर चालणाऱ्या नेतृत्वाच्या बाजूने आपण उभं राहायलाच हवं. आणि आज ते नेतृत्व म्हणजे राहुल गांधी आहेत.”
त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर तिखट शब्दांत टीका करत सांगितले की, “सध्या देशात तानाशाही प्रवृत्तीचं सरकार कार्यरत आहे. ते संविधानाच्या मार्गाने नाही, तर मनुस्मृतीच्या विचारसरणीने देश चालवण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तर संविधानाऐवजी मनुस्मृती टेबलावर ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला.”
यावेळी त्यांनी जातीय जनगणनेचा मुद्दा उपस्थित करत, “56 इंचाची छाती म्हणवणाऱ्या पंतप्रधानांना अखेर जातीय जनगणना मान्य करावी लागली आणि यामागे राहुल गांधी यांचा स्पष्ट भूमिका कारणीभूत ठरली,” असे नमूद केले.
“राहुल गांधी यांच्या प्रयत्नामुळेच ओबीसी समाजाच्या हक्कांना न्याय मिळू शकतो. त्यामुळे हा समाज सावध राहून एकजूट करणे अत्यंत गरजेचे आहे,” असा पुनरुच्चारही वडेट्टीवार यांनी केला.