सोलापूर, वृत्तसंस्था
शिवयोगी श्री सिध्दरामेश्वरांच्या वास्तव्याने पावन झालेली सोलापूर नगरी हे शरण संस्कृतीचे केंद्र असल्याचे सांगतानाच या शहरात चारदिवसीय शरणतत्व शिबिर होणे ही बाब गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन अक्कलकोटचे निरंजन मूर्ती बसवलिंग महास्वामी यांनी केले.
दावणगिरी येथील अज्जमपुरशेट्टरु सेवा ट्रस्ट आणि बसवबळगा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोलापुरातील बसवेश्वर विचारवादी संस्था आणि संघटनाच्या सहयोगाने या शिबिराचे कस्तुरबा मार्केटजवळील लिंगशेट्टी मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी अक्कलकोटचे श्री म.नि. प्र. बसवलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते वृक्षास पाणी घालून शिबिराचे उद्धाटन झाले.
यावेळी बसव पिठावर दावणगिरी बसवबळगचे अध्यक्ष हुचप्पा मास्तर, प्रा.सिद्धणा लंगोटी, जयश्री चडचणकर, परमानंद अलहोंडा, डॉ.भीमराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पी रुद्रप्पा यांनी प्रास्ताविक केले. शरण धर्माबाबत जागृती होण्याची गरज आहे. बसवादी शरणांनी सांगितलेल्या मूल्यांच्या संवर्धनासाठी प्रत्येक लिंगायत बांधवांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे रुद्रप्पा यांनी सांगितले.
प्रारंभी निरंजनमूर्ती बसवलिंग महास्वामी यांच्या हस्ते शटस्थल ध्वजारोहण करण्यात आले. लातूरचे प्रा.डॉ.भीमराव पाटील यांनी तत्वाशील समाजासाठी वचन चिंतन या विषयावर मांडणी केली. सूत्रसंचालन यांनी केलं. डॉ.बी.बी.पुजारी यांनी आभार मानले. या शिबिरात देशभरातील अभ्यासकसह सोलापूर जिल्ह्यातील शरण संस्कृतीचे पाईक मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.
वचने सात्विक जीवनाचे मंत्र
महात्मा बसवण्णा आणि शिवयोगी सिद्धारामेश्वर यांच्यासह शरणांची वचने सात्त्विक जीवनाचे मंत्र असल्याचे प्रतिपादन प्रा.सिद्धण्णा लंगोटी यांनी केले. आपल्या चिंतनशील भाषणात प्रा. लंगोटी यांनी, कल्याण पर्वातील शरण चळवळ, अनुभव मंटपातील सर्वसमावेशक परंपरेचा आढावा घेतला. शरण परंपरेत जन्मलेल्या आपण सर्वांनी विभूतीं, इस्टलिंग पूजा आणि वचनांचे अध्ययन करणे आवश्यक असल्याचे प्रा. लंगोटी यांनी सांगितले.