नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ‘इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) भूमिकेबाबत सविस्तर भाष्य केले. त्यांनी हलक्या फुलक्या शब्दांत राजकीय विरोधकांवरही टीका केली, “कधी कधी मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, तेव्हा AI मदत करू शकते,” असे म्हणत विरोधकांना कोपरखळी लगावली.
फडणवीस यांनी सांगितले की, हा AI समिट भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण वेगाने बदलणाऱ्या AI क्षेत्रात भारताने साधलेली प्रगती जगासमोर मांडण्याची ही संधी आहे. विविध क्षेत्रांमध्ये क्रांती घडवणाऱ्या AI संदर्भात जागतिक नेते भारतात येऊन चर्चा करत आहेत, हे देशाच्या वाढत्या क्षमतेचे द्योतक आहे. विशेषतः कृषी क्षेत्रातील AI आणि महाराष्ट्राने साधलेल्या यशावर केंद्रित सत्राला मोठा प्रतिसाद मिळाला.
जागतिक अन्न प्रणालींवर वाढती ताण निर्माण होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. हवामानातील अनिश्चितता, घटत चाललेली भूजल पातळी, मातीची सुपीकता कमी होणे, पुरवठा साखळ्यांतील कमकुवतपणा आणि अनियमित बाजारपेठ यामुळे जागतिक शेतीवर दबाव आहे. विशेषतः ग्लोबल साऊथमधील देशांसाठी शेती ही फक्त आर्थिक क्रिया नसून उपजीविका, सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षेचा आधारस्तंभ आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारताने तंत्रज्ञानावर आधारित सर्वसमावेशक विकासाची दिशा स्वीकारली असल्याचे सांगताना फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाचे उदाहरण दिले. ‘इंडिया AI मिशन’चा उद्देश तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि मोठ्या प्रमाणावर परिणाम साधणे हा आहे, परंतु कृषी क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवणे अत्यावश्यक आहे. भारतातील अर्ध्या अब्जाहून अधिक लोकांचा थेट किंवा अप्रत्यक्ष उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे, तरीही शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील AI आधारित कृषी उपक्रमांबाबत सांगताना त्यांनी नमूद केले की, पारंपरिक कृषी विस्तार प्रणाली आजच्या गरजेनुसार अपुरी पडते. AIच्या साहाय्याने अतिसूक्ष्म स्तरावरील हवामान अंदाज, कीड प्रादुर्भावाबाबत आगाऊ सूचना, अचूक सिंचन आणि खत सल्ला, पीकआधारित कर्ज मूल्यमापन, पारदर्शक पुरवठा साखळी आणि तत्काळ बाजार मार्गदर्शन शक्य होते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतो आणि जोखीम कमी होते.
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, AIवर फक्त तंत्रज्ञानावर विसंबून राहता येणार नाही; त्यासाठी विश्वासार्ह डेटा आणि नैतिक प्रशासन आवश्यक आहे. पंतप्रधानांच्या उद्घाटन भाषणातील विचारांचा हवाला देत त्यांनी सांगितले की, विश्वास, नैतिक शासन आणि सार्वजनिक जबाबदारीशिवाय AIचा विस्तार शक्य नाही. कितीही प्रगत तंत्रज्ञान असले तरी लोकांचा विश्वास नसल्यास ते मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जाणार नाही, असे फडणवीस यांनी अधोरेखित केले.