नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील पहगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानाला जोरदार प्रत्युत्तर दिले. तीन दिवसांच्या भारत-पाकिस्तानमधील या संघर्षानंतर १० मे रोजी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता दोन्ही सीमांवरील भागात शांतता आहे.
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे राबविण्यात आल्याचे मोहिमेची देशभरात कौतुक झाले. पाकिस्तानविरोधात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची माहिती देशभरात पोहचविण्यासाठी भाजपकडून १३ ते २३ मे या कालावधीत तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. १० दिवस ही यात्रा चालणार आहे.
तिरंगा यात्रेच्या माध्यमातून भाजप जनतेपर्यंत ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती पोहोचवली जाणार आहे. भारताने देशाचा स्वाभिमान कशापद्धतीने बळकट केला, असा मेसेजही या माध्यमातून दिला जाणार आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात काढल्या जाणाऱ्या तिरंगा यात्रा आयोजनाची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेते संबित पात्रा, विनोद तावडे, तरुण चुघ या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. केंद्र आणि राज्यातील मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, अन्य पदाधिकारी तसेच सर्व स्तरावरील कार्यकर्ते तिरंगा यात्रेत सहभागी होणार आहेत.
ही यात्रा ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आयोजित केली जाईल, ज्यामध्ये सैन्यदलांच्या सन्मानार्थ विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचा समावेश असेल. या ऑपरेशन अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी तळ नष्ट केले. या ऑपरेशनमध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. तर दुसरीकडे काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी दिल्लीसह अन्य काही ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात आली होती.