ओडिशा : संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी गुरुवारी सांगितले की, भारताने अग्नि ५ या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. हे क्षेपणास्त्र रात्रीही मारा करण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र ५,४०० किलोमीटरहून अधिक लांबचे लक्ष अचूक भेदू शकते. एकाच फायरमध्ये हे क्षेपणास्त्र चीनची राजधानी बीजिंगपर्यंत पोहोचू शकते.
संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अग्नि ५ क्षेपणास्त्राची लांबी १७.५ मीटर लांब आणि व्यास २ मीटर आहे. अग्नि-५ क्षेपणास्त्रामध्ये १५०० किलो वजनाची अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. तीन स्टेजवर रॉकेट बूस्टर बसवण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा २४ पट अधिक वेगवान आहे. ते एका सेकंदात ८.१६ किमी अंतर कापते. नव्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता पाच हजार ते आठ हजार किलोमीटर पर्यंत आहे. इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल (ICBM) अग्नि-५ शिवाय, अग्नि मालिकेत भारतीय शस्त्रागारात अग्नि-१,अग्नि-२,अग्नि-३ , अग्नि-४ आणि पृथ्वी या क्षेपणास्त्राचा समावेश आहे.
ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरील अब्दुल कलाम चाचणी केंद्रात ही चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये पाकिस्तान आणि चीन येत आहेत, त्याचप्रमाणे रशिया, युक्रेन आणि इंडोनेशिया सारखे देशही रेंजमध्ये आले आहेत. हे क्षेपणास्त्र डीआरडीओ आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. या क्षेपणास्त्राचे वजन ५० हजार किलो आहे