मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून महाविकास आघाडीत जागावाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही असताना, त्याच जागेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भिन्न भूमिका घेतल्याने आघाडीत तणावाची चिन्हे दिसू लागली आहेत.
१६ मार्च रोजी १० राज्यांतील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक होणार असून त्यात महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे. याचवेळी राज्यात विधान परिषदेची निवडणूकही होणार आहे. विद्यमान संख्याबळानुसार या दोन्ही निवडणुकांत महाविकास आघाडीच्या वाट्याला प्रत्येकी एक अशा दोन जागा येण्याची शक्यता आहे.
आघाडीत सर्वाधिक संख्याबळ ठाकरे गटाकडे असल्याने त्यांनी दोन्ही जागांवर दावा सांगितल्याची माहिती आहे. राज्यसभेसाठी Sharad Pawar यांना पाठवण्यास त्यांची तयारी असल्याचे समजते. तर विधान परिषदेच्या जागेसाठी Uddhav Thackeray यांना उमेदवारी देण्याचा त्यांचा विचार असल्याचे बोलले जात आहे.
मात्र काँग्रेसने या भूमिकेला स्पष्ट आक्षेप घेतला आहे. शरद पवारांनी प्रथम सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसशी विलीनीकरणाच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेची जागा पवारांना देणे योग्य ठरणार नाही, असे काँग्रेसचे मत आहे.
काँग्रेसचे म्हणणे असे की, १६ आमदारांसह ते महाविकास आघाडीत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहेत. ठाकरे गट आणि पवार गट प्रत्येकी एक जागा घेत असतील, तर काँग्रेसच्या वाट्याला काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राज्यसभा किंवा विधान परिषदेपैकी एक जागा काँग्रेसला देण्यात यावी, असा त्यांचा आग्रह आहे.
दरम्यान, तिन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांमध्ये तोडगा काढण्यासाठी जोरदार चर्चा सुरू आहे. जागावाटपावर सर्वमान्य निर्णय घेण्याचा प्रयत्न सुरू असला तरी सध्याच्या घडीला महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण आहे. आगामी काही दिवसांत या राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.