निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, आजकाल लोक योगासने करतात तसेच, सकाळी आणि संध्याकाळी वर्कआउट (व्यायाम) देखील करतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी आणि चांगले शरीर तयार करण्यासाठी व्यायाम करत असतात. तर काहींना ‘सिक्सपॅक’ची क्रेझ असते. ऋतिक रोशन अन् विद्दुत जामवाल सारखे आपलेही दंड मजबूत असावे, असे त्यांना वाटते.
त्याकरिता जिम मध्ये जाणे आणि सिक्सपॅकची मायावी स्वप्ने बघणे हा आजकालच्या तरुण पिढीचा नवा फंडा आहे. शारीरिक सौंदर्य असणे हा आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे पण तो अविभाज्य घटक आहे असे नाही…. त्यामुळे आपण जिम किंवा तालमीत कोणत्या कारणासाठी जातो हे देखील जाणून घेतले पाहिजे.
आधुनिक जिम आणि तिथे केले जाणारे व्यायाम यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर अनेक फायदे तोटे लक्षात येतात. पण पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की संयमित आणि योग्य व्यायाम यासोबतच परिपूर्ण आहार घेतला तर आपण जिम चा फायदा करून घेऊ शकतो यात अजिबात शंका नाही.
आपले मानवी शरीर हे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सात धातूंपासून बनले आहे. रसापासून रक्त, रक्तापासून मेद, मेदापासून अस्थी… अशा क्रमाने एकेका धातूचे आधीच्या धातू पासून पोषण होते. आपण लक्ष देऊन पाहिले तर आधुनिक व्यायाम पद्धतीत फक्त मांस धातू पुष्ट करण्याकडे कल दिसतो. मग त्यामध्ये स्टीरॉईड घ्या, व्हे प्रोटीन घ्या, मांस खा आणि मसल वाढवा असा विचित्र संदेश सर्वत्र पसरला गेला आहे. आणि हा चुकीचा संदेश आहे.
शरीराच्या आतल्या अवयवांना आवरण म्हणून आणि वंगण म्हणून मेद अर्थात चरबीची योग्य मात्रा शरीरात असणे अपेक्षित आहे. त्यामुळे ‘झिरो फॅट’ ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. एकच धातू (मांस) वाढवण्याच्या दृष्टीने जास्त प्रयत्न होत असतील आणि फक्त मांस पुष्ट दिसेल असा व्यायाम होत असेल तर पुढील मांसाच्या पुढचे धातू कमकुवत होतात.
आणि त्यानंतर हाडांची दुखणी, शुक्रधातू आणि प्रजननाशी संबंधित आजार इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते. जे पुढे गंभीर रूप धारण करतात. तालमीत पैलवान करतात तो व्यायाम आणि त्यांचा आहार या सगळ्याचा अभ्यास केला तर भारतीय व्यायाम पद्धतच सर्वात आदर्श आहे असे लक्षात येते.
आपण पहिले तर जिम मध्ये जाणाऱ्या आणि तालमीत जाणाऱ्या मुलांमध्ये बरेच फरक दिसतात. तालमीत नियमित जाणारी मुले जास्त उत्साही आणि निरोगी असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. त्यामुळे जिम मध्ये व्यायाम करत असाल तर तो प्रमाणाबाहेर जास्त ताण घेऊन करू नका. शरीराला किती कट्स पडतात यापेक्षा प्रकृती स्थिर आहे का याचाही अभ्यास केला पाहिजे.
नियमित व्यायाम करणाऱ्यांनी नेहमीच्या आहारातही योग्य ते संतुलन ठेवले तर निश्चित चांगला फायदा होतो. त्यामुळे भारतीय संस्कृतीत सांगितलेला सूर्यनमस्कार हा परिपूर्ण व्यायाम मानला आहे. शास्त्रोक्त सुर्यनमस्काराने शरीराचे काहीही उपकरण न वापरता शारीरिक सौंदर्य टिकून राहते. तसेच मन, प्राणशक्ती, आणि एकाग्रतेवर काम होते आणि दुखापतींचा धोका देखील कमी होतो.
अनेक अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय व्यायाम पद्धती म्हणजे आरोग्य, शांती, सहनशक्ती, आणि आत्मिक विकासाचा समतोल मार्ग. ती केवळ फिटनेस नव्हे, तर जीवनशैली सुधारण्याची शक्ती देते.
भारतीय व्यायाम पद्धतीचे प्रमुख प्रकार कोणते?
- योग :
हजारो वर्षांची परंपरा
शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील समतोल राखतो
विविध आसने, प्राणायाम, ध्यान आणि ध्यानधारणा यांचा समावेश
आजारांवर उपयोगी : मधुमेह, रक्तदाब, तणाव, पचन विकार - सूर्यनमस्कार :
१२ स्टेप्सचा व्यायामाचा संपूर्ण प्रकार
शरीरातील प्रत्येक स्नायू सक्रिय करतो
फायदे : वजन कमी करणे, लवचिकता, पचन सुधारणा, चयापचय वाढवणे - प्राणायाम :
प्राणशक्ती नियंत्रणासाठी
विविध प्रकार : अनुलोम-विलोम, कपालभाती, भस्त्रिका
फायदे : मानसिक स्थिरता, श्वसनसंस्थेचं आरोग्य, तणाव नियंत्रण - मल्लखांब :
पारंपरिक भारतीय क्रीडा-व्यायाम
दोरी किंवा खांबावर शरीराचं संतुलन साधून केलेला व्यायाम
फायदे : ताकद, लवचिकता, शरीरावर नियंत्रण - दंड-बैठका :
अख्ख्या शरीरावर परिणाम करणारा व्यायाम
मल्ल्यांनी, योगींपासून सगळे करतात
फायदे : स्नायू शक्ती, सहनशक्ती, फुफ्फुसांचं कार्य सुधारते - नित्यकर्मातिल व्यायाम (दैनंदिन आचरणीय क्रिया) :
चालणे, धावणे, गोठ्यातील कामं, शारीरिक कष्ट. इत्यादी.